तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 05:28 PM2020-08-28T17:28:58+5:302020-08-28T17:54:33+5:30

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बुधवारी आलेल्या बदलीच्या आदेशाने त्यांच्या चाहत्या वर्गाला धक्का बसला आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. राज्याचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले. त्यामुळे आता तुकाराम मुंढेंच्या जागेवर राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त राहणार आहेत.

तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली आहे. जवळपास वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतेच. नवी मुंबई, नाशिक महापालिकेचे आयुक्त, जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे नेहमीच वाद होत आले आहेत. तुकाराम मुंढे यांना कोरोना झालेला असताना त्यांची बदली करण्यात आल्याने टीका होत आहे.

निडर आणि कडक शिस्तीचा आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुंढे यांनी हाल अपेष्ट सहन करत यशाची उंची गाठली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे ते आहेत.

गावची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच हजाराच्या आसपास. अशा लहानशा गावखेड्यातून आलेल्या मुंढेंनी प्रशासकीय सेवेतील जोरावर महाराष्ट्रात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलंय. मात्र, शेती-मातीशी जुळलेली नाळ आणि आई-वडिलांनी केलेले संस्कार हेच माझ्या कामाची शिदोरी असल्याचं तुकारम मुंढे सांगतात.

सात महिन्यांत मी नागपुरात रिझल्ट दिले. सरकारने बदलीचा आदेश दिला आहे पण खरं सांगू लोकांचा थेट संबंध असलेल्या संस्थांमध्ये काम करणे मला नेहमीच आवडेल.प्रत्येक ठिकाणी किमान दोन वर्षे तरी मिळाली पाहिजेत. कारण समाजात असंख्य नागरी प्रश्न आहेत आणि कुठलाही दबाव सहन न करता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तेवढीच आवश्यकता आहे.

माझे आईवडील शेतकरी. जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं भलं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान त्यांनी मला दिलं. त्यानुसार मी चालत राहीन, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

नागपुरात माझ्याविरोधात कुठलेही मुद्दे मिळत नाहीत म्हटल्यानंतर माझ्या चारित्र्यहननाचे प्रकार घडविण्यात आले. महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेण्याचे प्रकार घडले,असा गौप्यस्फोट मुंढे यांनी केला. दररोज माझ्याविरुद्ध आरोप केले जात होते, पद्धतशीरपणे मला टार्गेट करण्यात आले.

माझे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चारपाच महिने झाले. असे का करण्यात आले? त्यात भाजपाचे लोक होते, दुसरे कोण करणार तुम्हीच सांगा, असा सवाल तुकाराम मुंढे यांनी केला.

आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांनी फार हाल अपेष्ट सहन करत यशाची उंची गाठली आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या आतापर्यतच्या वाटचालीचा उलगडा केला होता.

तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे आहेत. तुकाराम मुंढे यांचं बालपण गावातच गेलं आहे. गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायची, त्यानंतर आठवडा बाजारात जाऊन भाजी विकायची. त्यानंतर आठवड्याभराचा संसार आणि दोन वेळचं जेवण आपल्याला मिळेल अशा दृष्टीने प्रयत्न करायचे अशी तुकाराम मुंढेंची परिस्थती होती.

तुकाराम मुंढे यांनी अवघ्या दहा वर्षांचे असताना कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी यासाठी शेती करायला सुरुवात केली. मात्र शेतीतून उत्पन्न कमी मिळत होतं.

तुकाराम मुंढे यांच्या मोठ्या भावाला आयएएस व्हायचं होतं पण आर्थिक परिस्थिती नसल्यानं त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची इच्छा तुकाराम मुंढे यांच्याकडे व्यक्त केली, आणि तु कलेक्टर होऊन माझी इच्छा पूर्ण कर असं सांगितले होतं. भावाच्या या इच्छेनंतर त्यांनी खूप मनापासून अभ्यास केला.

तुकाराम मुंढे सांगतात की मी शिक्षण गेत असताना माझ्या वाटेत अनेक अडचणी आल्या. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मेन्सची तयारी केली. मात्र मेन्स परिक्षेच्या पहिल्या प्रयत्नात तुकाराम मुंढे नापास झाले होते. यानंतर तुकाराम मुंढे यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला. त्यात ते प्रिलिअम पास झाले पण मेन्समध्ये पुन्हा अपयश आलं. मात्र तुकाराम मुंढेंनी प्रयत्न सुरुच ठेवला.

दूसऱ्यांदा नापास झाल्यानंतर तुकाराम मुंढेंनी तिसरा प्रयत्न केला. यामध्ये प्रिलियम आणि मेन्स दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत पोहोचले. मात्र मुलाखतीमध्ये त्यांनी यश मिळालं नाही.

त्यानंतर २००३ साली एमपीएससीचा अंतिम निकाल आला. यामध्ये तुकाराम मुंढे यांच्या यांचं क्लास २ मध्ये सिलेक्शन झालं. यानंतर २००४ साली तुकाराम मुंढे प्रिलिअम पास झाले, मेन्स पास होणार याची खात्री असल्याने त्यांनी मुलाखतीची तयारी सुरु केली. यानंतर ११ मे २००५ रोजी अंतिम निकाल आला आणि तुकाराम मुंढे यांनी भारतातून २०वा क्रमांक पटकावला होता.