मुंबईचं 'हे' रूप मनमोहक, पण...; लॉकडाऊन काळात 'थांबलेली' मायानगरी, कधीच विसरता न येणारी!

By मुकेश चव्हाण | Published: February 2, 2021 03:28 PM2021-02-02T15:28:23+5:302021-02-02T17:02:11+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात आले होते. या लॉकडाऊदरम्यान सर्व व्यवसाय ठप्प झाले आणि त्यामुळे आपली मुंबईची लोकल देखील बंद करण्यात आली होती.

“कृपया, गाडीचे पायदान आणि प्लॅटफॉर्म वरील अंतरावर लक्ष द्या!” हे ऐकण्यासाठी मुंबईकरांचे कान आतुरतेने वाट पाहात होते. मात्र हे ऐकण्यासाठी मुंबईकरांना तब्बल ९ महिन्यांची वाट पहावी लागली.

मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी. असं म्हणतात ही स्वप्नांची नगरी कधीही, कोणासाठीही थांबत नाही. उन, वारा, पाऊस काहीही असो मुंबई कधीही झोपत नाही. परंतु कधीही न थांबणाऱ्या मुंबईला करोना विषाणूने मात्र ठप्प केलं.

ही माणसांअभावी थांबलेली मुंबई खूपच सुंदर दिसत होती. मात्र लॉकडाऊन काळात 'थांबलेली' मायानगरी, कधीच विसरता येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाखोंच्या संख्येनं येणारी गर्दी तसेच बाहेर देशातून येणाऱ्या लोकांचंही मुख्य ठिकाण असलेल्या परिसरात लॉकडाऊनदरम्यान शुकशुकाट पाहायला मिळला. तो फक्त आणि फक्त 'कोरोना विषाणूमुळे'!

जागतिक साथीच्या आजाराला रोखण्यासाठी, या आजाराचे संक्रमण होऊ देणार नाही आणि इतरांनाही संक्रमित होण्यापासून वाचवू, असा निश्चिय मुंबईकरांनी केला, आणि लॉकडाऊनला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद दिला.

आम्ही तुम्हाला लॉकडाऊनदरम्यान थांबलेल्या मायनगरी मुंबईतील काही ठिकाणांचे फोटो दाखवत आहोत. हे फोटो तुम्ही नक्की तुमच्याजवळ जपून ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण असं पुन्हा मुंबईचं रुप पाहाता येणार नाही, असं माझंतरी वैयक्तिक मत आहे.

पाहा निर्जन, मोकळे रस्ते, वास्तूकलेचा उत्कुष्ट नमुना असलेल्या इमारती, अथांग समुद्र… अन् बरंच काही...

स्वच्छ, शांत, निवांत मुंबईचं हे रूप मनाला भावणारं असलं, तरी मुंबापुरी गजबजलेली असावी, महाराष्ट्राची शान आणि देशाचा अभिमान असलेली ही आर्थिक राजधानी पुन्हा बंद पडू नये, असंच कुणीही म्हणेल.

सध्या हळूहळू पुन्हा मुंबई पूर्ववत होण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने देखील कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली केली आहे.

सर्व सामान्य प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत प्रवास करता येणार नाही, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.