'राज्य संकटात आहे, राजकारणातील गुन्हेगारीकरण पुन्हा ऐरणीवर'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:54 AM2021-03-21T10:54:33+5:302021-03-21T11:13:18+5:30

माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत.

दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.

त्यानंतर, विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय. तर, भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही ट्विट करुन आणि व्हिडिओ शेअर करत भाजपावर निशाणा साधलाय.

राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे, असे ट्विट पंकजा यांनी केलंय.

पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन यांसदर्भात व्हिडिओही शेअर केला आहे. तसेच, राज्य सरकारच्या कामागिरीवर टीका करताना राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्याचा आऱोपही केलाय

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपा नेते आणि समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरासमोर भाजपा नेत्यांनी घोषणाबाजी करत अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला

राज्यातील विविध ठिकाणी सराकरविरोधी आंदोलनं करण्यात येत असून डोंबिवलीतही आमदार रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे सरकार चोर है...म्हणत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार भ्रष्ट असल्याचं स्पष्ट झालंय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी तात्काळा गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायालाच हवा, अशी मागणी केलीय.