#ShivJayantiSpecial : अष्टप्रधान मंडळाचे हे ८ प्रमुख होते शिवाजी महाराजांचे खरे आधारस्तंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:10 AM2018-02-19T11:10:19+5:302018-02-19T12:32:28+5:30

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जून १६७४ मध्ये झाला. महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे शिवरायांच्या मराठी साम्राज्याला चेतना मिळाली. या समारंभात शिवरायांना 'छत्रपती' पद देऊ करण्यात आलं. तसंच न्यायदानाचे अधिकार छत्रपतींकडेच असल्याने राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक करण्यात आली.

१) पंतप्रधान : मोरोपंत त्रिंबक पिंगळे - शिवरायांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असायचा. पंतप्रधान पदाला वार्षिक १५ हजार होन पगार मिळत असे.

२) पंत सचिव : अण्णाजीपंत दत्तो - शिवरायांच्या पत्रव्यवहारावर सांभाळणे, जमीन महसुलाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे, स्वराज्याचे दफ्तर सांभाळणे ही कामे यांच्याकडे होती. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

३) मंत्री : दत्ताजीपंत त्रिंबक - यांच्याकडे महाराजांचे खाजगी कारभार, भोजन व्यवस्था, वैयक्तिक संरक्षण याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

४) सेनापती : हंबीरराव मोहिते - शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींचे अधिकार होते. कोणत्याही युध्दाची आणखी करण्याचं काम सेनापतींकडे होतं. स्वराज्याला कायम उत्कृष्ट सेनापती मिळत गेले. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत होता.

५) पंत सुमंत : रामचंद्र त्रिंबक - परराष्ट्रासंबंधातील व्यवहार सांभाळणे, परराष्ट्रातून हेरांच्या मदतीने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावं लागत होतं. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

६) न्यायाधीश : निराजीपंत रावजी - स्वराज्याचे सरन्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांबाबत खटले चालवून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत होता.

७) पंडितराव दानाध्यक्ष : रघुनाथराव पंडित - धर्मखात्याचे प्रमुख म्हणून दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, ही कामे त्यांची होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

८) पंत अमात्य : रामचंद्र निळकंठ - मंत्रिमंडळातील महत्त्वाचा मंत्री असल्याने स्वराज्यातील सर्व महालांचा एकूण जमाखर्च बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्यांचे काम होते. या मुजुमदारांचा वार्षिक १२ हजार होन पगार होता.