शिंदेंना फोडलं, मविआला कमकुवत केलं, तरीही महाराष्ट्रात भाजपाला लोकसभा जड जाणार, ही आहेत कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:42 PM2023-01-31T13:42:27+5:302023-01-31T13:53:05+5:30

Lok Sabha Election in Maharashtra: नुकत्याच समोर आलेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेमधून महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या नेतृत्वाचील एनडीएचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने राजकीय विश्वात खळबळ उ़डाली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेमधून आज निवडणुका झाल्यास देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचं सरकार येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या सर्वेमध्ये महाराष्ट्रात मात्र भाजपाच्या नेतृत्वाचील एनडीएचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने राजकीय विश्वात खळबळ उ़डाली आहे.

इंडिया टुडे-सी वोटरच्या सर्व्हेनुसार आज लोकसभेची निवडणूक झाल्यास महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ जागांपैकी केवळ १४ जागा भाजपा आणि शिंदे गटाला मिळतील. तर महाविकास आघाडीला तब्बल ३४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, असं का होऊ शकतं या संदर्भातील माहिती समोर आली आहे.

२०१४ मध्ये भाजपा आणि शिवसेनेने अनुक्रमे २७.६ आणि २०.३ टक्के मते मिळवली होती. तेव्हा भाजपाला २३ तर शिवसेनेला १८ जागा जिंकता आल्या होत्या. तर एक जागा मित्रपक्षाला मिळाली होती. एनडीएला एकूण ५१ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला १६.१ आणि एनसीपीने १८ टक्के मते मिळवली होती. महाआघाडीला ३५ टक्के मते मिळाली होती. तर दोन्ही पक्षांना मिळून ६ जागा मिळाल्या होत्या.

त्यानंतर २०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढले. तेव्हा भाजपाने पुन्हा एकदा २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या. यावेळी भाजपाला २७.८४ तकर शिवसेनेला २३ टक्के मते मिळाली. दुसरीकडे आघाडी करून लढणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ३३ टक्के मतांसह ६ जागा जिंकल्या होत्या.

२०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसबा निवडणुकांमध्येही या पक्षांना मिळालेली मते याच प्रमाणात होती. याचा अर्थ मोदी लाटेमध्येही काँह्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने आपली ३४ टक्के मते कायम राखली. तर भाजपाला २८ आणि शिवसेनेकडे २० टक्के मते मिळाली. आता महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या मतांची बेरीज ही ५४ टक्क्यांपर्यंत जाते.

मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर इंडिया टीव्ही-सी वोटरने केलेल्या सर्वेनुसार जानेवारीत निवडणूक झाल्यास उद्धव ठाकरे हे किमान १० टक्के मते आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरतील, असे दिसून आले आहे.

त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील मतांची बेरीज ४४ टक्क्यांपर्यंत जाताना दिसत आहे. तर भाजपा आणि शिंदे गटाच्या मतांची बेरीज ही ३७ टक्क्यांपर्यंत जाताना दिसत आहे. त्यावरूनच महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. तर भाजपा आणि शिंदे गटाला १० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत ही आकडेवारी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१९ मध्ये अखिलेश यादव आणि मायावती यांनी महाआघाडी केल्यानंतरही उत्तर प्रदेशात भाजपाचं फार मोठं नुकसान झालं नव्हतं. तसेच निवडणूक आयोग आणि कोर्टात शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यास शिवसेनेतील समिकरणे बदलू शकतात. त्याबरोबरच मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गट पराभूत झाल्यास त्याचा फायदा भाजपा आणि शिंदे गटाला मिळू शकतो.