शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 03:26 PM2017-10-02T15:26:34+5:302017-10-02T15:34:25+5:30

शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी १० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. राष्ट्रपतींनी हिरवा झेंडा दाखवून शिर्डी-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ केला.

श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणा-या साईबाबांचा प्रसार जगभरात आहे. प्रत्येकाच्या मनामनात साई विसावले आहेत. महाराष्ट्राच्या अध्यात्म भूमीत शिर्डीला महत्वाचे स्थान आहे. साईबाबांनी शिर्डीला कर्मभूमी बनवून देवत्व प्राप्त केले. साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्यास या पवित्र भूमीत येण्याचे भाग्य मला मिळाल्याने मी कृतज्ञ झालो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

डिसेंबर महिन्यापर्यंत ‘नाईट लँडींग’ सुरू होईल अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानतळ धावपट्टीच्या वाढीनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील.

10 विमान कंपन्या शिर्डीतून सेवा देण्यास इच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या विमानतळाचा उपयोग केवळ भाविकांनाच नव्हे तर शेतकरी, व्यावसायिकांना चालना देण्यास होईल. त्यातून रोजगार उपलब्ध होईल. डिसेंबर महिन्यापर्यंत ‘नाईट लँडींग’ सुरू होईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.

परंतु ज्या काकडी गावातील शेतक-यांची संपूर्ण जमीन विमानतळात गेलेली आहे, अशा शेतक-यांना, नागरिकांनाच उद्घाटनादरम्यान विमानतळावर येण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे या शेतक-यांना विमानतळाचा उद्घाटनाचा सोहळा हा लांबून पहावा लागला.