Pandharpur Election Results 2021: विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:17 PM2021-05-02T18:17:19+5:302021-05-02T18:20:56+5:30

pandharpur election results 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला असून, या पराभवाची काही कारणे सांगितली जात आहे.

देशातील अन्य निवडणुकांप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.

विधानसभा पोटनिवडणूक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची ठरली. यामध्ये भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. (Pandharpur Election Results 2021)

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. मात्र, वडिलांच्या विजयाची परंपरा राखण्यात भगीरथ यांना अपयश आल्याचे सांगितले जात आहे.

भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यावरून राष्ट्रवादीत संभ्रम होता. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, भालके यांच्या कुटुंबातीलच उमेदवार असावा म्हणून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली.

भगीरथ भालके हे दहा वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. वडील आमदार असतानाच भगीरथ यांनी दोन चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवूनही पराभूत झाले होते. त्यानंतर ते राजकारणात फारसे दिसले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भगीरथ यांचा पराभव झालेला असतानाही त्यांना राष्ट्रवादीने विधानसभेचे तिकीट दिले. गेल्या काही वर्षात कारखान्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. इतिहासात पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी भारत भालकेंनी कर्ज मंजूर करुन घेतल्याने कारखाना पुन्हा सुरू झाला.

भगीरथ यांनी चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या आधी किंवा त्यानंतर त्यांचा जनतेशी संपर्क आला नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क ठेवून लोकांची कामे केली नाहीत.

भाजपचे समाधान आवताडे हे गेल्या काही वर्षांपासून थेट जनतेच्या संपर्कात होते. समाधान आवताडे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत.

निवडणूक मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा अपयशी ठरली. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीची यंत्रणा अत्यंत तोडकी होती. या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियापासून कॉर्नर बैठकांपर्यंतच्या सर्व प्रचार तंत्रावर जोर दिला होता. त्या तुलनेत आवताडे यांची यंत्रणा कुठेच दिसत नव्हती.

भगीरथ यांना या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अपयशाचाही फटका बसल्यांच दिसून आलं. राज्य सरकारने कोरोनाचं संकट नीट हाताळलं नाही. विठ्ठलाचं मंदिरही या सरकारने बंद केलं. संकटाच्या काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवलं, शेतकऱ्यांना त्रास दिला, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, कोरोना संकटात आर्थिक मदत दिली नाही, आदी मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात भाजप यशस्वी ठरले, अशी काही कारण राजकीय वर्तुळातील तज्ज्ञ आणि विश्लेषक देत आहेत.