Mumbai Bandh : पाहा 'मुंबई बंद'चे शहरभरातील पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 04:42 PM2018-07-25T16:42:38+5:302018-07-25T17:04:24+5:30

मुंबई- सकल मराठा समाजानं सुरू असलेला बंद स्थगित केला आहे. मोर्चेक-यांकडून शांतता राखण्याचं आवाहनही सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी केलं आहे. मुंबई व उपनगरांत पुकारलेला बंद संपवण्यात आला आहे.

तसेच मुंबई बंदला मुंबईकर आणि व्यापा-यांनी दिलेल्या प्रतिसादाबाबतही समन्वयकांनी आभार मानले आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली होती.

तसंच कार्यकर्त्यांना शांततेने आंदोलन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु मुंबई बंद यशस्वी करून दाखवण्यासाठी आंदोलकांनी दगड उचलल्याचं आणि रेल्वे अडवल्याचं पाहायला मिळालं होतं.

सरकारनं हातात दगड आणि लाठ्या दिल्या आहेत. अन्यायाविरुद्द मराठा समाज एकत्र आला. काही लोकांना त्रास झाला असेल त्यांची आम्ही क्षमा मागतो, असं सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले आहेत.

दोन वर्षांपासून सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. औरंगाबादेत आमच्या बांधवानं आत्मदहन केल्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्याची सल्लामसलत करून आम्ही बंदचा निर्णय घेतला होता. मुंबई बंद करायची असल्यास राजकीय पाठबळ लागत असल्याची भावना होती.

परंतु राजकीय पाठिंब्याशिवाय आम्ही बंद यशस्वी करून दाखवला आहे. राजकीय हेतूने बंद पेटवल्याचा संशयही वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.

सकल मराठा समाजानं सुरू असलेला बंद स्थगित केला आहे. मोर्चेक-यांकडून शांतता राखण्याचं आवाहनही सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी केलं आहे.

बंद शांततेच्या मार्गाने सुरू असतानाच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे या बंदला गालबोल लावणाऱ्या घटना घडल्या. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

मुंबई, ठाण्यात तर आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून नुकसान केले. मुंबईतील मानखुर्दमध्येही आंदोलकांनी बेस्ट बसवर दगडफेक करत पेटवून दिली.

सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग विझवली.

मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

तर नवी मुंबईतील कळंबोली येथे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.