Maharashtra Unlock: राज्यात 'अनलॉक'साठी पाच स्तर, तुमचा जिल्हा नेमका कोणत्या स्तरात? काय बंद, काय सुरू? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:53 PM2021-06-03T17:53:11+5:302021-06-03T18:19:35+5:30

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात आता अनलॉकला सुरुवात झालीय. यासंदर्भातील तुम्हाला माहित असायला हवी अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील अनलॉक संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. यात राज्यात पाच स्तरांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. तुमचा जिल्हा नेमका कोणत्या स्तरामध्ये येतो हे जाणून घेऊयात...

राज्यातील एकूण १८ जिल्ह्यांचा पहिल्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. म्हणजेच या १८ जिल्ह्यांमध्ये सर्व गोष्टी या पूर्वीप्रमाणे सुरू होणार आहेत. यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पहिल्या स्तरातील या १८ जिल्ह्यांमध्ये रेस्टॉरंट्स, मॉल्स, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, खासगी आणि सरकारी कार्यालयं, थिएटर्स, चित्रपटांचं चित्रीकरण, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा, सर्व प्रकारची दुकानं हे पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसऱ्या स्तरामध्ये एकूण ५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार यांचा समावेश करण्यात आला आहे.

दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांसाठी जवळपास पहिल्या स्तराप्रमाणेच मुभा असेल फक्त यात 50 टक्के क्षमतेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये ५० टक्के क्षमतेनं हॉटेल सुरु असतील. मॉल चित्रपट गृह ५० टक्के क्षमेतेने सुरु असतील.

मुंबईची लोकल मात्र सुरु असणार नाही. सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी असेल. शासकीय आणि खासगी सगळी कार्यालय खुली असतील. क्रीडा सायंकाळ सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु असतील.

तिसऱ्या स्तरामध्ये एकूण १० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक सध्या करण्यात येणार नाही. पण निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी आणि रविवारी इतर दुकानं बंद राहणार आहेत.

चौथ्या स्तरामध्ये पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला २० लोक उपस्थित राहू शकतील.

पाचव्या स्तरात पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील त्या जिल्ह्यांना रेड झोनमध्ये टाकलं जाईल. याठिकाणी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.

Read in English