Maharashtra Lockdown: ठाकरे सरकारचा ‘अनलॉक प्लॅन’ ठरला?; १ जूनपासून 'ही' दुकानं उघडणार पण वेळ बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 11:44 AM2021-05-25T11:44:46+5:302021-05-25T11:50:49+5:30

Maharashtra Unlock News Updates: राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता ३१ मे पर्यंत हे नियम लागू आहेत. या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाली असल्याने अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं राज्यातील कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार सरकार करत आहे. सूत्रांच्य माहितीनुसार राज्यात टप्प्याटप्याने अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याचा विचार सुरू आहे. जर प्लॅन यशस्वी ठरला तर १ जूनपासून महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करेल

मागील वेळेप्रमाणे सरकार प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून पाऊल टाकत आहे. अनलॉकबाबत अद्याप अधिकृत कोणतीही भूमिका ठरली नाही. परंतु अनलॉकबाबत अनेक पर्याय समोर येत आहेत. ज्यावर सरकार लवकरच कार्यवाही करेल.

मुंबईत मागील काही दिवसांत नवीन रुग्णांची संख्या दीड हजारांवर आली आहे. बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के आहे. अशावेळी मुंबईत कोरोनाचं संकट कमी होताना दिसत आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य सरकार १ जूननंतर लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील २४ वार्डातील आता फक्त १० वार्डात कन्टेन्मेंट झोन आहेत. तर १४ वार्ड कन्टेन्मेंट झोनमुक्त झालेत. ७ वार्डात एकही मायक्रो कन्टेन्मेंट झोन नाही. तर एका वार्डात एकही बिल्डिंग सील नाही. मुंबईत आता ४४ कन्टेन्मेंट झोन आहेत. ज्यात २.३३ लाख लोक राहतात.

कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल्यानंतर २,७४७ कन्टेन्मेंट झोनमुक्त करण्यात आले. सूत्रांनुसार महाराष्ट्रात चार टप्प्यात अनलॉक सुरू होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकानांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मान्सूनमुळे सरकार यावर गांभीर्याने विचार करत आहे.

पावसाळ्यापूर्वी मेन्टेन्स आणि मान्सून संबंधित दुकाने उघडण्याची परवानगी मिळू शकते. त्याचसोबत राज्यातील दुकानं उघडी ठेवण्याची वेळ मर्यादाही राज्य सरकारकडून वाढवली जाऊ शकते. आता सध्या अनेक दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ११ या कालावधीत उघडण्याची परवानगी आहे.

माहितीनुसार, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किराणा माल, पावसाळ्यासाठी लागणाऱ्या सामानाची दुकानं खुली ठेवण्याची परवानगी राज्य सरकार देऊ शकतं. दुकानं उघडण्याची परवानगी देत असताना त्यासोबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात येईल. ज्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना केलेल्या असतील.

तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकार रेस्टॉरंट, बार आणि वाईन शॉप उघडण्याची परवानगी देऊ शकतं. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून याठिकाणी एसओपी लागू केली जाऊ शकते. रेस्टॉरंटमध्ये किती क्षमता असावी हे या निर्णयात असू शकतं.

चौथ्या टप्प्यात सरकार लोकल सेवा आणि धार्मिळ स्थळं उघडण्याची परवानगी देऊ शकतं. परंतु अनलॉक करताना सरकार १० वेळा विचार करेल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पहिल्या लाटेने आम्ही धडा शिकलो आहे त्यामुळे निर्बंध हटवण्यावर काहीच बोलू शकत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, पुढील १५ दिवस लोकल सेवेची परवानगी सर्वांना देऊ शकत नाही. लोकल्स सुरू झाल्या तर गर्दी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे सरकार त्याची परवानगी देणार नाही असं मंत्री विजय वड्डेटीवर म्हणाले आहेत.

राज्यात मागील काही दिवसांपासून दुकानं बंद असल्याने व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले आहेत. त्यामुळे १ जून पासून राज्य सरकार दुकानं उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकतं असा विश्वास दुकानदारांना आहे. जर सर्वकाही ठीक राहिलं तर चौथ्या टप्प्यात उर्वरित गोष्टींवरील सर्व निर्बंध हटवले जाऊ शकतात.

Read in English