परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:49 PM2021-03-20T20:49:11+5:302021-03-20T20:55:37+5:30

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. (param bir singh letter to cm uddhav thackeray)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. (param bir singh letter to cm uddhav thackeray)

या भ्रष्टाचाराबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनाही माहिती दिल्याचा मोठा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय तसेच राजभवन येथेही पाठवण्यात आले असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. दोन्ही कार्यालयांकडून याबाबतच्या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे.

मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेस गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले, असे परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. (mukesh ambani bomb scare)

इतकंच नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अनिल देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथे उपस्थित असलेल्या अन्य मंत्र्यांना खरंतर ही माहिती आधीच होती असे माझ्या लक्षात आले, असे सिंग यांनी पत्रात सांगितले.

सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्स यूनिटचे प्रमुख होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत. त्यातील प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये गोळा केले तरी महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.

फेब्रुवारीच्या मध्यावर सचिन वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे खासगी सचिव पलांडे हेदेखील उपस्थित होते. घरातील एक ते दोन स्टाफ मेंबरही तिथे होते, असे परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीनंतर सचिन वाझे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितले. मला त्याचा धक्का बसला. ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली.

दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आलं. त्यावेळी पलांदे आत होते.

केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील ४० ते ५० कोटी रुपये १७५० बार, हॉटेलमधून जमा होतील, असं पलांदे म्हणाले. याची माहिती संजय पाटील यांनी मला दिली, असेही सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

अनिल देशमुख अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांना निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट द्यायचे.

टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे काही खळबळजनक दावे परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केले आहेत.

दरम्यान, भाजप अधिक आक्रमक झाला असून, या प्रकरणात परमबीर सिंगांना अटक करा आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व प्रश्नांना रात्री जनतेसमोर खुलासा करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.