आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेऊनही आजोबांनी वयाच्या ६६ व्या वर्षी लग्न का केलं?

By manali.bagul | Published: November 8, 2020 12:30 PM2020-11-08T12:30:04+5:302020-11-08T13:52:30+5:30

Senior journalist madhav patil get married at 66-age goes Viral : केवळ स्वतःचाच विचार न करता पत्नीच्या कुटुंबालाही माधव पाटील यांनी न्याय दिला आहे.

लग्न करून संसार थाटणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. काहीजण याला अपवाद असतात. तरुणपणी साखरपुडा मोडला म्हणून आयुष्यभर लग्न न करता ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटील यांनी अखेर ६६ व्या वर्षी लग्न केलं.

आयुष्यभर लग्न कर म्हणून मागे लागलेल्या नातेवाईकांचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या माधव पाटील यांनी कोरोनाच्या माहामारीमुळे हा निर्णय घेतला. फक्त स्वतःचाच विचार न करता पत्नीच्या कुटुंबालाही माधव पाटील यांनी न्याय दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून ज्या आजोबांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची टिंगल टवाळीही केली जात आहे. सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सद्वारे खिल्ली उडवली जात आहे.

उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारिता करतात. रायगड मधील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, म्हातारपणी लग्न केल्यामुळे ते आणखीचं प्रसिद्ध झाले आहेत.

आयुष्यभर लग्नच न करणाऱ्या माधव पाटलांनी या वयात लग्न का केलं असा प्रश्न अनेकांना पडतो. माधव पाटील यांचे वयाच्या तिशीत लग्न ठरले होते. साखरपुढासुद्धा वाजत गाजत झाला होता. मात्र काही कारणास्तव त्यांचे ठरलेलं लग्न मोडलं. लग्नावरून विश्वास उडाल्यानंतर त्यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला.

दिवसेंदिवास वय वाढत होतं. माधवराव घरातील एकूलता एक मुलगा होता. पण घरात सूनबाई येईल, कामाला हातभार लागेल अशा सर्व प्रकारे माधव पाटलांना समजावूनही ते लग्नासाठी तयार झालेले नाहीत. पण कोरोनाने माधव पाटलांचे डोळे उघडले.

गेले 7 महिने घरात एकटं राहणाऱ्या माधव पाटलांना एकांत खाऊ लागला. पत्नी असावी अशी भावना त्यांना जाणवू लागली. आईचे वय 88 वर्ष, स्वतःचे वय 66 वर्ष. त्यामुळे घर सांभाळणारे कोणीतरी असावे. याची जाणीव झाली. यामुळे अखेर माधव पाटील यांनी लग्न करायचं ठरवलं.

त्याच्या पत्नीचे नाव संजना असून संजनाचे हे दुसरे लग्न आहे. घटस्पोटीत असलेल्या संजना यांचे वय 45 असून त्यांच्या माहेरी भावाचे कोरोनाने निधन झाल्याने आधार हारपला होता. त्यांनाही उतार वयात आधाराची गरज असल्याने आपल्या पेक्षा 20 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माधव पाटील यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

संजनाला माधवरावांच्या वयावरून अनेकांनी हिणवले. पण याची परवा न करता उतार वयात साथ देण्यासाठी या दोघांनी लग्न केलं. सोशल मीडियावर सध्या टिकेचे, टिंगल-टवाळीचे कारण झालेल्या माधव पाटील आणि संजना पाटील यांना आता कशाचीही पर्वा नाही.