'हे' आहेत भारतातील 5 सर्वात विषारी साप, चावल्यावर क्षणात होतो मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 04:10 PM2021-12-26T16:10:50+5:302021-12-26T16:16:04+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी 54 लाख लोकांना साप चावतात, त्यापैकी 80 हजार ते 1.40 लाख लोकांचा मृत्यू होतो.

आज सकाळी बॉलिवुड अॅक्टर सलमान खान (Salman Khan) ला सर्पदंश झाल्याची माहिती समोर आली. सलमान खान आपल्या फार्म हाउसवर असताना त्याला सापाने चावा घेतला. पण, तो साप विषारी नसल्यामुळे काळजीचे कारण नव्हते. प्रथामिक उपचारानंतर सलमानला घरी पाठवण्यात आले. पण, साप चापल्याने जगभरात लाखो मृत्यू होतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी 54 लाख लोकांना सर्पदंश होतो. त्यापैकी 80 हजार ते 1.40 लाख लोकांचा मृत्यू होतो. साप चावल्यानंतर काही मिनीटांमध्ये उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो. जगात विषारी सापाच्या अनेक जाती आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 सर्वाधिक विषारी सापांबद्दल माहिती देणार आहोत.

किंग कोब्रा- हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. याची लांबी 18 फूटापर्यंत असू शकते. हा साप आपल्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच करू शकतो. या सापाचे शास्त्रीय नाव 'ओफीफॅगस हॅना' आहे. याच्या दंशाने 7 मिलीलीटर विष शरीरात जाते. हा साप चावल्यानंतर काही मिनिटातच मृत्यू होऊ शकतो.

इंडियन क्रेट- हा भारतातील सर्वात विषारी साप मानला जातो. हा साप चावल्यानंतर एकाच वेळी बाहेर पडणारे विष 60 ते 70 लोकांचा बळी घेते. त्याची खासियत अशी आहे की तो रात्री झोपलेल्या लोकांवरच हल्ला करतो. हे लोकांच्या हात, पाय, तोंड आणि डोक्यावर हल्ला करतात. हा साप चावल्यानंतर वेदना होत नाहीत आणि झोपेत व्यक्तीचा मृत्यू होतो.

इंडियन कोब्रा- भारतात आढळणारा इंडियन कोब्रा हा देखील अतिशय विषारी साप आहे. भारतात या सापाला नाग या नावानेही ओळखले जाते. हिंदू धर्मात त्याची पूजा केली जाते. भारतात जवळपास सर्वच भागात हा साप आढळतो. माणसाला त्याच्या चाव्यापासून वाचणे फार कठीण आहे. प्रौढ कोब्राची लांबी 1 मीटर ते 1.5 मीटर (3.3 ते 4.9 फूट) पर्यंत असू शकते.

रसेल वायपर- हा साप भारतातील अनेक राज्यात आढळतो. हा साप दरवर्षी सूमारे 20 हजार लोकांना चावतो. तसेच, या सापाच्या दंशामुळे जगभरात दरवर्षी सुमारे 58 हजार लोक मरण पावतात. रसेल वायपरचे वैज्ञानिक नाव 'डबोइया रसेली' आहे. दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत अनेकदा भाताच्या शेतात शेतकऱ्यांना हा साप चावल्याच्या घटना घडतात. या सापाच्या विषामुळे किडनी निकामी होते. योग्यवेळी उपचार न मिळाल्यावर मृत्यूही होऊ शकतो.

सॉ-स्केल्ड वायपर- या सापाची लांबी लहान आहे, परंतु त्याची चपळता, वेग आणि आक्रमक वृत्ती त्याला धोकादायक बनवते. त्याचा परिणाम जीवघेणा असतो. याच्या चाव्यामुळे दरवर्षी सुमारे 5000 लोकांचा मृत्यू होतो. हा साप खूप विषारी आहे.