जे बात!...म्हणून त्यानं सगळी संपत्ती दोन हत्तींच्या नावावर केली, रक्ताचे नातलगच झाले वैरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 11:54 AM2020-06-09T11:54:14+5:302020-06-09T12:47:11+5:30

पटणापासून जवळ असलेल्या दानापूरच्या अख्तर इमाम यांनी त्यांची सगळी संपत्ती त्यांचे दोन हत्ती मोती आणि राणीच्या नावावर केलीये.

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला होता. हत्तीणीला फटाके भरलेला अननस खाण्यासाठी देण्यात आल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे ही घटना अमानवीय असल्याचं बोललं गेलं होतं. अशात बिहार राज्यातील एका व्यक्तीने एक अनोखं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील एका व्यक्तीने त्याची संपूर्ण संपत्ती त्याच्या दोन हत्तींच्या नावावर केलीये. या घटनेची चर्चा राज्यभरातील गल्ली बोळात झाली नसती तर नवल. पटणापासून जवळ असलेल्या दानापूरच्या अख्तर इमाम यांनी त्यांची सगळी संपत्ती त्यांचे दोन हत्ती मोती आणि राणीच्या नावावर केलीये. (प्रातिनिधीक छायाचित्र)

इतकेच नाही तर अख्तर यांनी त्यांच्या हत्तींसाठी ऐरावत नावाचं एक ट्रस्टही सुरू केलं. अख्तर यांनी सांगितले की, मोती आणि राणी हेच त्यांचा परिवार, मित्र आणि सगळं काही आहेत. पण असं करणं अख्तर यांना जरा अडचणीचं ठरलं आहे. कारण त्यांनी संपत्ती हत्तींच्या नावावर केल्यामुळे त्यांच्या घरातील लोक वैरी झाले आहेत. (प्रातिनिधीक छायाचित्र)

अख्तर यांचा आरोप आहे की, त्यांचा मुलगा मेराजने एकदा तस्करांसोबत मिळून हे हत्ती विकण्याचा प्रयत्न केला होता. अख्तर मोती आणि राणीवर इतकं प्रेम का करतात याचाही एक खास किस्सा आहे. (image Credit : freepik.com)

अख्तर यांच्यानुसार, एकदा उशीरा रात्री काही लोक बंदूक घेऊन त्यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या कॅम्पसमध्ये शिरले होते. हे बघून हत्तींनी ओरडणं सुरू केलं आणि अख्तर हे झोपेतून जागे झाले. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेले लोकही पळाले.

आरोप आहे की, प्रॉपर्टीसाठी अख्तरच्या मुलाने प्रेयसीसोबत मिळून वडिलांवर रेपचा खोटा आरोपही लावला होता. अख्तर यांना तुरूंगातही जावं लागलं होतं. पण ते चौकशीत निर्दोष आढळले.

अख्तर यांच्यानुसार ते 10 वर्षांपासून पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहतात. एरावत संस्थेचे प्रमुख अख्तर सांगतात की, ते 12 वर्षाचे असतानापासून हत्तींची सेवा करत आहेत.

कौंटुंबिक वाद असल्याने आजपासून 10 वर्षाआधीच त्यांची पत्नी दोन मुलं आणि मुलगी माहेरी निघून गेली होती. अशात मोठा मुलगा मेराज याचं चुकीच्या मार्गाला जाणं पाहून त्याला संपत्तीतून बेदखल केलं.

पत्नीला अर्धी संपत्ती लिहून दिली आणि स्वत:च्या वाटणीची जवळपास 5 कोटी रूपयांची संपत्ती त्यांनी दोन्ही हत्तींच्या नावे केली आहे. अख्तर सांगतात की, जर दोन्ही हत्तींची हत्या झाली तर ही संपत्ती एरावत संस्थेला दिली जाईल. हे देशातलं किंवा जगातलं अशाप्रकारं एकुलतं एक उदाहरण असावं.

Read in English