काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघाल्यास संपूर्ण प्रदेशाला त्याचा फायदा होईल; इम्रान खान यांची चर्चेला तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:34 PM2021-03-18T17:34:05+5:302021-03-18T17:40:54+5:30

Pakistan Imran Khan : जम्मू काश्मीरच्या विषयावर तोडगा निघाल्यास त्याचा फायदा होईल, असं मत इम्रान खान यांनी सुरक्षा संवादादरम्यान व्यक्त केलं.

अनेकदा भारतानं प्रयत्न करूनही पाकिस्ताननं सुधारण्याचं नाव घेतलं नव्हतं. परंतु आता पाकिस्तानकडूनही चर्चेचे प्रयत्न होताना दिसत आहेत.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जोवर भारत हे कलम पुन्हा लागू करत नाही तोवर कोणतीही चर्चा करणार नसल्याची भूमिका घेतली होती. परंतु आता पाकिस्तान ही अट सोडून चर्चा करण्यास तयार झाला आहे.

सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटातही सापडला आहे. त्यात भारतासोबत असलेल्या तणावाच्या वातावणामुळे त्यांच्यावरील हे संकट अधिकच जटील होत आहे. पाकिस्तानलादेखील याची माहिती आहे.

अशा परिस्थितीतच तणाव कमी झाला तर याचा फायदा संपूर्ण प्रदेशाला होणार असल्याचं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं. इम्रान खान यांचं हे वक्तव्य आणि माघार हा भारताच्या रणनितीचा विजय आहे.

जर काश्मीरच्या प्रकरणावर तोडगा निघाला तर याचा फायदा संपूर्ण प्रदेशाला होईल, असं इम्रान खान म्हणाले. दोन्ही देशांमध्ये नियंत्रण रेषेवर शांततेसाठी सहमती झाल्यानंतर इम्रान खान यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

यासोबतच दोन्ही देशांमध्ये सिंधू पाणी करारावरही चर्चा होणार आहे. ३० मार्च रोजी तझाकिस्तानची राजनाथई दुशांबे येथे अफगाणिस्तान येथे आयोजित एका कॉन्फरन्समध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही बोलावण्यात आलं आहे.

आपण चांगल्या शेजारी राष्ट्राप्रमाणे भारतासोबतच चर्चेद्वारे समस्यांचा तोडगा काढण्यास तयार आहोत. परंतु हे काम करत नाही. आमच्यामध्ये केवळ काश्मीरचा मुद्दा आहे. भारतानं कलम ३७० हटवल्यानंतर शांततेचे प्रयत्न कमी केले. तसंच यानंतर आम्हाला अनेक पावलं मागे यावं लागलं, असं इम्रान खान इस्लामाबाद येथे आयोजित सुरक्षा संवादादरम्यान बोलत होते.

"काश्मीरचा मुद्दा सोडवला गेला तर भारतालादेखील मध्य आशियात व्यापाराची व्यापक संधी मिळेल. याच मुद्द्यावरून सर्वकाही थांबलं आहे. आपण पूर्ण प्रयत्न केले परंतु भारतानं यात रस दाखवला नाही," असं ते म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यावरून दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी एक मंच तयार केला जात असल्याचं वाट आहे. यापूर्वी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनीदेखील पाकिस्तानसोबत चर्चेसाठी सकारात्मक वक्तव्य केलं होतं.

भारत आपला शेजारी देश पाकिस्तानसोबत उत्तम संबंध ठेवू इच्छितो. आम्ही प्रत्येक मुद्द्याचा द्विपक्षीय आणि शांततामय मार्गान निराकरण करू इच्छितो. आम्ही रचनात्मक परिस्थितीत योग्य चर्चासाठी तयार आहोत. असं श्रृंगला म्हणाले होते.

यावेळी चर्चेसाठी भारतानंदेखील कोणत्याही अटी ठेवल्या नव्हत्या.

सध्या इम्रान खान यांचे पायदेखील खोलात आहेत. सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकदा त्यांना आपले खर्चदेखील भागवणं शक्य होत नाहीये.

तर दुसरीकडे इम्रान खान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानंही झटका दिला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पार्टी तसेच आपल्या तपास समितीला नोटीस जारी करून २२ मार्च रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. विदेशातून मिळालेल्या निधीची कागदपत्रे दडवून ठेवल्याच्या प्रकरणात त्यांची बाजू स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानच्या माध्यमांत आलेल्या वृत्तांमध्ये याबाबतची माहिती दिलेली आहे. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे असंतुष्ट संस्थापक सदस्य अकबर एस. बाबर यांच्याकडून पक्षाची कागदपत्रे दडवून ठेवल्याच्या तपास समितीच्या निर्णयाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही नोटीस जारी केली आहे.

कायद्यानुसार याचिकाकर्त्याला दस्तावेज प्राप्त करण्याचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी म्हटले आहे की, दस्तावेज गुप्त ठेवून निवडणूक आयोगाची तपास समिती तपासाच्या अटींचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे दोहोंच्या उपस्थितीत तपास करणे आवश्यक आहे.