"दहशतवादाचं केंद्र, लादेनलाही शहीद म्हणतात इम्रान खान"; UN मध्ये भारताचा पाकिस्तानवर पुन्हा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:16 AM2021-10-05T08:16:30+5:302021-10-05T08:35:07+5:30

India in United Nations : दहशतवादाला खतपाणी घालण्यावरून अनेकदा भारत आणि अन्य देशांनी पाकिस्तानवर निशाणा साधला होता.

दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना खतपाणी घालण्यावरून अनेकदा भारतासह काही देशांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नाव न घेतला संयुक्त राष्ट्रांमध्ये (Pm narendra modi in united nations) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारतानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

"पाकिस्तान भलेही संयुक्त राष्ट्रांमध्ये शांतता आणि सुरक्षेच्या गोष्टी करतो, परंतु त्यांचे पंतप्रधान इम्रान खान जागतिक दहशतवागी ओसामा बिन लादेनला शहीद म्हणतात," असं म्हणत भारतानं त्यांच्यावर हल्लाबोल केला. यापूर्वी इम्रान खान यांनी लादेनला शहीद असं संबोधलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीकाही झाली होती.

युनायटेड नेशनमध्ये भारतानं राईट टू रिप्लाय अंतर्गत फर्स्ट कमेटी जनरल डिबेटमध्ये पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी या ठिकाणी शांतता आणि सुरक्षेच्या गोष्टी करत आहेत. पण दुसरीकडे त्यांचे पंतप्रधान ओसामा बिन लादेन सारख्या जागतिक दहशतवाद्याला शहीदाच्या रुपात दाखवत आहे," असं भारतानं म्हटलं.

आपल्या सेजारी राष्ट्रांतील दहशतवाद्च्या मुद्द्यावरूनही भारतानं जोरदार हल्लाबोल केला. "जागतिक दहशतवादाच्या केंद्राच्या रुपात पाकिस्तान युनायटेड नेशन्सच्या तत्त्वांची कोणतीही काळजी न घेता सातत्तानं आपल्या शेजारी देशांविरुद्ध सीमेवर दहशतवादात सामील राहिला. अनेक व्यासपीठांवर खोटं पसवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हे सामूहिकरित्या अवमान करणारे आहेत," असंही भारतानं म्हटलं.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील संयुक्त राष्ट्रांमध्ये संबोधित करताना पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद व घातपाती कारवायांसाठी होणार नाही याची जगाने दक्षता घेतली पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशाला दिला होता.

दहशतवादाचा इतर देशांविरोधात वापर करणाऱ्यांनाही या गोष्टीपासून धोका आहे. योग्यवेळी योग्य काम पूर्ण नाही केले तर ते काम असफल होते, हे आर्य चाणक्य यांचे वचन उद्धृत करत मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं होतं.

संयुक्त राष्ट्रांमध्ये यापूर्वी भारताच्या सचिव स्नेहा दुबे यांनीदेखील पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं. दहशतवादी ओसामा बीन लादेनला शहीद म्हणणारे जगाचे लक्ष हटवण्यासाठी जागतिक स्तरावर पाकिस्तान दुष्प्रचार करत आहे, असं भारतानं सुनावलं होतं.

भारताने पाकिस्तानवर टीका करताना दहशतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचं म्हटलं. तसंच यावरच न थांबता पाकिस्ताननं अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारतानं केला.

आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचं सांगण्याचे प्रयत्न झालेले पाहिले. जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणे स्वीकार करण्याची गोष्ट नाही, या शब्दांत भारतानं पाकवर हल्लाबोल केला.