चीनचा रावळपिंडी प्लॅन; भारताला घेरण्यासाठी असे रचतोय खतरनाक कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:25 PM2020-09-10T12:25:30+5:302020-09-10T12:34:12+5:30

भारताला घेरण्यासाठी चीनने नवे खतरनाक कारस्थान आखले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला आहे.

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या भारत आणि चीनमधील तणाव हा शिगेला पोहोचलेला आहे. दोन्हीकडचे सैन्य समोरासमोर असून, वातावरण स्पोटक बनले आहे. त्यातच भारतीय लष्कराने सामरिक आघाडी घेतलेली असल्याने चिनी सैन्याची कोंडी झालेली आहे. त्यामुळे आता भारताला घेरण्यासाठी चीनने नवे खतरनाक कारस्थान आखले आहे.

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यानुसार आता पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना प्यादे बनवून भारताविरोधात दोन बाजूंनी आघाडी उघडण्याची तयारी चीनने केली आहे.

भारतीय लष्कराने गलवान खोरे आणि आता पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैन्याचे कपटकारस्थान हाणून पाडल्याने ड्रॅगनचा तीळपापड झालेला आहे. त्यामुळे चीनला वारंवार १९६२ च्या युद्धाची आठवण येत असून, तेव्हा पाकिस्तानी सैन्याला एलओसीवर उभे करून दुसरीकडून चीनने स्वत: भारताविरुद्ध युद्ध पुकारले होते. त्याप्रमाणेच आताही भारताला दोन मोर्चांवर घेरण्याची तयारी चीनने केली आहे.

गुप्तहेर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेवर सैन्याची तैनाती वाढवण्याच्या बदल्यात चीनने पाकिस्तानसोबत एक करारसुद्धा केला आहे. त्या करारानुसार चीन पाकिस्तानला हत्यारे आणि नवे तंत्रज्ञान देईल.

चीन आपल्या व्हीटी-४ टँकसह नवीन तंत्रज्ञानसुद्धा पाकिस्तानला देणार आहे.

याशिवास चीन पाकिस्तानला १२० अल खालिद-१ टॅकच्या निर्मितीमध्ये मदत करणार आहे. गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार चीन पाकिस्तानसाठी केवळ टँक अपग्रेड करत नाही आहे तर तोफखान्याचा दर्जा सुधरवण्यासाठीदेखील मदत करत आहे.

पाकिस्तान चीनच्या एसएच-१५ ट्रॅक माऊंटेन गन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्याचा वापर पाकिस्तान पीओकेमध्ये अनेक ठिकाणी करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानला ए-१०० मल्टिपल रॉकेट लाँन्चर दिले आहेत.

एवढेच नाही तर पाकिस्ता चीनच्या मदतीने VIOP म्हणजेच व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून गोपनीय मॉनिटरिंग सिस्टिम तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामाध्यमातून पाकिस्तानचा भारतावर नजर ठेवण्याचा इरादा आहे.