Taliban: “काश्मीर प्रश्नी तालिबान आम्हाला मदत करणार आहे”; पाकिस्तानमधील नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:19 PM2021-08-25T18:19:58+5:302021-08-25T18:24:29+5:30

Taliban: पाकिस्तानमधील सत्ताधारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या एका नेत्याने काश्मीरसाठी तालिबान पाकिस्तानला मदत करणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

तालिबानने एकेक करून अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळण्यासाठीही तालिबान प्रयत्नशील आहे.

भारत सरकार तालिबानशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता पाकिस्तानमधील सत्ताधारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या एका नेत्याने काश्मीरसाठी तालिबान पाकिस्तानला मदत करणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

पीटीआयच्या माहिला नेत्या नीलम इरशाद शेख यांनी टीव्हीवरील लाइव्ह चर्चेदरम्यान तालिबानने काश्मीरमध्ये पाकिस्तानला मदत करण्याची घोषणा केल्याचे वक्तव्य केले आहे.

तालिबानने आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आम्हाला सांगितले असून, ते काश्मीरमध्ये आम्हाला मदत करणार आहेत, असे म्हटले आहे. तसेच तालिबान आपल्याला मदत करेल कारण त्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देण्यात आलीय, असेही त्या पुढे म्हणाल्या.

यापूर्वीही पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी तालिबानला मदत केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यापूर्वीच अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्तेचे स्वागत केले आहे.

गुलामगिरीच्या जोखडातून तालिबानची सुटका झाली. जेव्हा आपण दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करतो तेव्हा आपण मानसिकरित्या गुलाम होतो. सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर येणे सोपे नसते. अफगाणिस्तानात आता जे काही होत आहे. ते गुलामगिरीच्या साखळ्या तोडण्यासारखे आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य प्रस्थापित झाल्याने अमेरिका, ब्रिटेन, उत्तर कोरिया, ऑस्ट्रेलियासहित अनेक देशांनी आपली दूतावास बंद केले आहेत. हे देश अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत शेकडो लोकांना भारत सरकारने अफगाणिस्तानमधूनभारतात सुरक्षित आणले आहे. मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये काही नागरिक आहेत, जे भारतात परत येऊ इच्छित नाहीत. या लोकांची संख्या ७० ते ८० च्या दरम्यान आहे.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेले हे हिंदू आणि शीख अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ते भारताकडून पाठवण्यात आलेली विमाने सोडत आहेत. या परिस्थितीमुळे भारत सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. या लोकांना अमेरिका आणि कॅनडामध्ये जाण्याच्या नादात दोन वेळा विमान सोडले आहे. भारत सरकार उच्चस्तरीय सुविधा उपलब्ध करून देत असतानाही हे लोक भारतात येण्यास नकार देत आहे.

भारत सरकारने अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधून राजदूत आणि दुतावासामधील अन्य कर्मचाऱ्यांसह सुमारे २०० जणांना हवाई दलाच्या सी-१९ विमानातून भारतात परत आणले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमधून सामान्य नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे.