Corona Vaccine: भारतात गरज असताना इतर देशांना लस का निर्यात केली? परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 02:37 PM2021-05-08T14:37:19+5:302021-05-08T14:44:50+5:30

Corona Vaccine: कोरोना विरोधी लसींचा भारतात तुटवडा निर्माण झाला आहे. भारतात लसींची निर्मिती होत असूनही देशाची गरज पूर्ण झालेली नसतानाही इतर देशांना निर्यात का केली जातेय? यामागचं कारण परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितलं आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी कोरोना संकट काळातही निवडणुकांच्या प्रचार सभांच्या आयोजनावरुन सरकारची पाठराखण केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. ऑक्सिजनच्या मुबलक पुरवठ्यासाठी केंद्र सरकारनं जंगजंग पछाडल्याचा दावा देखील जयशंकर यांनी यावेळी केला.

भारताच्या 'व्हॅक्सीन डिप्लोमसी'चा देखील एस.जयशंकर यांनी बचाव केला. भारतात कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन्ही लसींची निर्मिती केली जात आहे. लसींची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जातेय. पण देशात कोरोना लसींच्या तुटवडा निर्माण झाला आहे. यावरुन केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यावर एस.जयशंकर यांनी केंद्र सरकारसमोर लस निर्यातीचा नाईलाज झाला असल्याची माहिती दिली.

भारतानं इतर देशांना लस निर्यात करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय 'कोव्हॅक्स करार' केला आहे. याअंतर्गत लसींची निर्यात करणं बंधनकारक आहे. "अनेक देशांना कमी किमतीत लस उपलब्ध करुन देण्याचा देखील करारात उल्लेख होता आणि शेजारील राष्ट्रांची देखील काळजी आपल्याला होती. आपल्या दरवाजाबाहेर कोरोना वाढावा अशी आपली इच्छा नाही", असं एस.जयशंकर यांनी म्हटल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं आहे.

इंडिया इंक ग्रूपचे चेअरमन आणि सीईओ मनोज लाडवा यांच्यासोबत एस.जयशंकर यांची व्हर्च्युअल मुलाखत झाली. यात जयशंकर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सरकार अजिबात कमी पडलेलं नाही. पण सध्याची स्थिती अशावेळी निर्माण झाली की जेव्हा वाटलं होतं की कोरोनाची पहिली लाट आटोक्यात आली आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत दैनंदिन पातळीवर १० हजारपेक्षा कमी रुग्ण वाढत होते. पण आता हा आकडा तब्बल ३८ टक्क्यांनी वाढला आहे, असं जयशंकर म्हणाले.

लस निर्मिती जरी भारतात होत असली तरी कोरोना हे जागतिक संकट आहे हे विसरुन चालणार नाही. लसींच्या पुरवठ्याबाबत आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करुनच मार्ग काढावे लागतात, असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे.

वैद्यकीय क्षेत्रात ऑक्सिजनची मागणी १ हजार मेट्रीक टन इतकी होती ती आता वाढून ७,५०० ते ८००० पर्यंत पोहोचली आहे. सध्याच्या आरोग्य संकटात ही मागणी पूर्ण करणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो आणि त्यादृष्टीनं निष्ठेनं प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन निर्मितीला आम्ही वैद्यकीय क्षेत्रासाठी ऑक्सिजन निर्मितीसाठी अनेक उद्योगपतींना प्रोत्साहीत करण्यात आलं आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल देखील ऑक्सिजन एक्स्प्रेसनं वाहतुकीसाठी मदत करत आहेत. भारतात केवळ १२०० ऑक्सिजन टँकर होते. आता नायट्रोजन टँकर्सदेखील ऑक्सिजन टँकर्समध्ये रुपांतरीत करण्याचं काम सुरू आहे. याशिवाय परदेशातूनही टँकर्स खरेदीचं काम सुरू आहे, असं एस.जयशंकर यांनी सांगितलं.

भारतातील लस निर्मात्या कंपन्यांनी भारताची लसीची गरज पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढविण्याची योजना केली होती. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लसीचा कच्चा मालाचा तुटवडा असल्याचं स्पष्ट झालं, असं एस.जयशंकर यांनी सांगितलं.

लस निर्मितीसाठीच्या कच्च्या मालाची आयाज करण्यात करण्यासाठी विविध देशांशी सातत्यानं संपर्कात राहून परराष्ट्र मंत्रालय शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं आहे.