Manoj Kumar Sharma IPS: HSC नापास, पण गर्लफ्रेंडनं संपूर्ण आयुष्य बदललं; शिपायाचं काम करणारा IPS अधिकारी बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 02:11 PM2021-10-16T14:11:04+5:302021-10-16T14:15:38+5:30

प्रत्येक जण आपली स्वत:ची एक वेगळी ओळख बनवण्यासाठी धडपड करत असतो. त्यासाठी काही तर दिवसरात्र अभ्यास करत मेहनत घेत असतात. परंतु इतकं करुनही जर पदरी निराशा पडली तर मुलांचं मानसिक खच्चीकरण होते. त्यानंतर चुकीचं पाऊल उचललं जातं.

परंतु आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने कमी वयात मोठं यश पटकावलं आहे. आयुष्यात अनेकदा अयशस्वी ठरला. पराभव सहन करावा लागला. बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. परंतु हिंमत हरली नाही आणि वेगळी ओळख बनवली.

ही गोष्ट आहे IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची. १२ वीच्या वर्गात मनोज कुमार शर्मा(Manoj Kumar Sharma IPS) नापास झाले होते. परंतु त्यांनी हार मानली नाही. देशात सर्वात कठीण अशा UPSC परीक्षेत यश मिळवत मनोज कुमार शर्मा IPS अधिकारी बनले.

मनोज कुमार शर्मा यांच्या यशामागील गोष्ट खूप उत्साहित करणारी आणि इतर स्पर्धकांना प्रेरणा देणारी आहे. मनोज कुमार शर्मा मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात राहणारे आहेत. लहानपणापासून IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न मनोज शर्मा यांचं होतं.

मात्र १२ वीच्या वर्गात मनोज कुमार शर्मा नापास झाले. इतकचं नाही तर ९वी, १०वी वर्गातही तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. १२ वी मध्ये हिंदी वगळता इतर सर्व विषयात मनोज शर्मा नापास झाले. परीक्षेत अयशस्वी झाल्यानंतरही स्वत:वरील विश्वास त्यांनी ढासळू दिला नाही.

आपल्या आयुष्यातील लक्ष्यापासून मागे हटायचं नाही हे त्यांनी मनात ठरवलं. पदवीनंतर देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मनोज शर्मा यांनी स्वत:वर एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात शिक्षणासाठी ग्वालियरमध्ये टेम्पो चालवला असल्याचंही म्हटलं आहे.

मनोज कुमार शर्मा यांच्या घरातील परिस्थिती इतकी खराब होती की, त्यांच्या घरावर छप्परही नव्हते. त्यामुळे भिकाऱ्यांसोबत त्यांना राहावं लागत होते. परंतु इतक्या संघर्षानंतरही त्यांनी आकाशाला गवसणी घालत मोठं यश पटकावतं इतरांसाठी प्रेरणादायी बनले.

दिल्लीत एका लायब्ररीमध्ये मनोज शर्मा यांनी शिपायाची नोकरी केली. त्यावेळी त्यांनी गोर्की आणि अब्राहम लिंकनसारखे आत्मचरित्र वाचले. पुस्तकांचे वाचन करून मनोज यांना जीवनाचा खरा उद्देश कळाला. मनोज १२ वी असताना एका मुलीवर प्रेम करत होते

परंतु आपलं प्रेम कधीही त्या मुलीसमोर कबुल केले नाही. १२ वी नापास झाल्याचं कळताच ती मुलगी प्रेमाला नकार देईल अशी भीती त्यांना होती. अखेर मुलीसमोर त्यांनी एकेदिवशी प्रेमाची कबुली दिली. तू मला हो बोल, साथ दे मी पूर्ण जग बदलेन अशा शब्दात त्यांनी मुलीला प्रपोज केले.

त्यानंतर मनोजने प्रचंड मेहनत घेत तिला सांगितलेल्या गोष्टी पूर्ण केल्या. UPSC परीक्षा देत यश पटकावलं. २००५ मध्ये महाराष्ट्र कॅडरमधून ते IPS अधिकारी बनले. सध्या ते मुंबईच्या पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहेत.