फळं-भाज्यांवर फवारलेल्या रसायनांमुळे मुलं होतात अर्ली मॅच्युअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 02:47 PM2019-02-22T14:47:16+5:302019-02-22T15:00:56+5:30

मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी विविध स्तरांवर संशोधन करण्यात येत असतात. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, मुलांमध्ये अर्ली प्यूबर्टी म्हणजेच अर्ली मेच्युरिटी येत असल्याचे स्पष्ट झालं आहे. अनेकदा भाज्यांवर अथवा फळांवर पडणाऱ्या किडीपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी त्यांवर अनेक औषधं, रसायनं फवारण्यात येतात. तर अनेक शेतकरी आर्थिक फायद्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी या रसायनांचा अधिकाधिक वापर करतात.

आता तुम्ही विचार कराल की, फळं आणि भाज्या व्यवस्थित धुतल्याने हे केमिकल्स निघून जातील. पण हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. अनकदा हे केमिकल्स फळं आणि भाज्या धुतल्यानंतरही जात नाहीत. जेवल्यानंतर ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. एवढचं नाही तर शरीरातील हार्मोन्समध्ये गडबड करतात. पण यापासून बचाव करणं एवढंही अवघड नाही. जाणून घेऊया काही अशा सामान्य पद्धती ज्यांचा वापर करून या घातक रसायनांपासून तुम्ही मुलांचा बचाव करू शकता.

भाज्या आणि फळांना 5 ते 10 मिनिटांसाठी व्हिनेगरमध्ये ठेवा. त्यानंतर व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या. गाजर आणि वांगी यांसारख्या भाज्या चिंचेच्या पाण्याने स्वच्छ करा.

फ्लॉवर, पालक, ब्रोकली, कोबी यांसारख्या भाज्या स्वच्छ करण्यासाठी मीठाच्या गरम पाण्याचा वापर करा. यामुळे केमिकल्स निघून जाण्यास मदत होते.

काही फळं आणि भाज्या ज्यांच्यावर वॅक्स करण्यात येतं त्या स्वच्छ करण्यासाठी एक कप पाणी, अर्धा कप व्हिनेगर, एक मोठा चमचा बेकिंग सोडा आणि द्राक्षाच्या बीयांचा अर्क एकत्र करून एक तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर भाज्या धुण्यासाठी वापर करा. (Image Credit : Popular Science)

भाज्या आणि फळं धुण्यासाठी नळातून येणारं स्वच्छ पाणी किंवा पिण्याच्या पाण्याचा वापर करून स्वच्छ कपड्याने किंवा पेपर नॅपकिनच्या मदतीने कोरड्या करा. बटाटे, गाजर इत्यादी भाज्या धुण्यासाठी नरम ब्रश आणि कोमट पाण्याचा वापर करा.

कोबीसारख्या पानं असलेल्या भाज्या धुण्याआधी त्याची वरची पानं काढून घ्या. आंबा किंवा किवी यांसारखी फळं किंवा फळ भाज्यांची वरची साल काढल्यानंतरच त्यांच्या फोडी करा.