मुलाच्या मृत्यूनंतर बदललं होतं सूनेचं वागणं, प्रायव्हेट डिटेक्टिवने केला खतरनाक खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:53 PM2021-10-07T12:53:39+5:302021-10-07T13:13:01+5:30

Haryana Crime News : यमुनानगरमधील कोट्याधीश बिझनेसमन योगेश बत्रा यांच्या हत्याकांडात यमुनानगर जिल्हा कोर्टाने त्याची पत्नी प्रियंका बत्रा, प्रियकर रोहित आणि दोन कॉन्ट्रॅक्ट किलर सतीश व श्यामसुंदरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हरयाणाच्या यमुनानगर जिल्हा कोर्टाने हत्या आणि हत्येचा प्लॅन करण्याच्या एका हायप्रोफाइल प्रकरणाचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाने प्रियंका बत्रा नावाच्या एका महिलेला तिचा जिम ट्रेनर प्रेमी आणि इतर दोन कॉन्ट्रॅक्ट किलरसोबत मिळून आपल्या पतीची हत्या करून मृत्यू सामान्य दाखवण्याचा प्रयत्न केल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

यमुनानगरमधील कोट्याधीश बिझनेसमन योगेश बत्रा यांच्या हत्याकांडात यमुनानगर जिल्हा कोर्टाने त्याची पत्नी प्रियंका बत्रा, प्रियकर रोहित आणि दोन कॉन्ट्रॅक्ट किलर सतीश व श्यामसुंदरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. साधारण ४ वर्ष चाललेल्या या केसमध्ये बरेच चढउतार आले होते.

अखेर २५ साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर आणि पुराव्यांच्या आधारावर कोर्टाने चारही आरोपींना हत्येच्या आरोपात दोषी ठरवलं. त्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने प्रियंकासहीत इतर दोषींना ६० हजार रूपयांचा दंडही ठोठावला आहे.

यमुनानगरचे प्लाय व्यापारी सुभाष बत्रा यांना आपल्या सूनेवर तेव्हा संशय आला जेव्हा २७ मे २०१६ च्या रात्री योगेशच्या मृत्यूची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी ते खटीमाहून यमुनानगरला पोहोचले. त्यांना प्रियंकाने सांगितलं की, योगेशचा मृत्यू सायलेंट अटॅकमुळे झाला.

आधी तर त्यांनी सूनेच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. पण काही दिवसांनी जेव्हा त्यांना प्रियंकाच्या वागण्यावर संशय आला तर त्यांनी आपल्या स्तरावर एक प्रायव्हेट डिटेक्टीव सूनेमागे लावला. त्याद्वारे प्रकरणाची सगळी माहिती घेतली. तेव्हा त्यांना समजलं की, प्रियंकाचं तिच्या जिम ट्रेनर रोहित कुमारसोबत अफेअर सुरू होतं.

बिझनेसमन सुभाष बत्रा यांचा दावा आहे की, त्यांच्या हाती असे काही पुरावे आणि फोटो लागले की, त्यांच्या संशय खरा ठरला. सुभाष बत्रा यांनी या प्रकरणाची माहिती यमुनानगर पोलिसांना दिली. यमुनानगर पोलिसांनी चौकशी करून आरोपीना क्लिन चीटही दिली होती. त्यानंतर सुभाष बत्रा हरयाणाच्या डीजीपींना भेटले.

तेव्हा या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपवली. करनाल एसआयटीने या केसवर मेहनत घेतली आणि पुराव्यांच्या आधारावर, मोबाइल लोकेशनसारख्या टेक्निकल तथ्यांच्या आधारावर चार आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.