सैराटची पुनरावृत्ती! वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 04:15 PM2021-06-25T16:15:39+5:302021-06-25T16:38:01+5:30

दिल्लीत सैराटची पुनरावृत्ती; मुलीच्या कुटुंबाकडून नवदाप्मत्यावर हल्ला; मुलाचा मृत्यू

पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटासारखीच एक घटना नवी दिल्लीत घडली आहे. सैराटच्या पुनरावृत्तीनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलीस या घटनेचा विविध बाजूंनी तपास करत आहेत.

नवविवाहित दाम्पत्य विनय आणि किरण यांचं एकमेकांवर प्रेम होतं. वर्षभरापूर्वी त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. लग्नानंतर ते अतिशय आनंदात होते. मात्र त्या कुटुंबाला किरणच्या कुटुंबियांचीच नजर लागली.

गुरुवारी रात्री ६ ते ७ जण विनय आणि किरण यांच्या घरात शिरले. त्यांमी दोघांवर गोळ्या झाडल्या. त्यात विनयचा जागीच मृत्यू झाला. तर किरण मृत्यूशी झुंज देत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय आणि किरणचा विवाह कुटुंबियांना मान्य नव्हता. कारण दोघांचं गोत्र एकच होतं. अमराई परिसरातील एका घरात गोळीबार झाल्याची माहिती डीसीपी संतोष मीणा यांना गुरुवारी रात्री मिळाली.

विनयला ४ गोळ्या लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी किरणला एक गोळी लागली असून तिचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. पोलिसांना मुलीच्या कुटुंबावर संशय असून त्यांनी त्या दृष्टीनं तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली आहे. आरोपींमध्ये मुलीचा सख्खा भाऊ, काका आणि चुलत भावाचा समावेश आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत.

आरोपींच्या शोधासाठी सोनीपत आणि हरयाणाच्या इतर भागांमध्ये छापे टाकण्यात येत आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

किरण आणि विनय दिल्लीतल्या अमराई गावात एका घरात भाड्यानं राहत होते. नव्या घरात येऊन त्यांना १० दिवस झाले होते. लग्नामुळे दोन्ही कुटुंब नाराज असल्यानं त्यांचा कुटुंबाशी संपर्क नव्हता.

हल्लेखोरांनी गोळीबार सुरू करताच किरण छताच्या दिशेनं पळाली. तिनं इमारतीच्या छतावरून दुसऱ्या छतावर उडी मारली. तिथे एका महिलेला तिनं मिठी मारली आणि वाचवण्याची विनंती केली. मात्र तोपर्यंत तिला एक गोळी लागली होती.

विनय जीव वाचवण्यासाठी खाली पळाला आणि आरोपींनी त्याला घेरलं. त्यांनी त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडण्यापूर्वी हल्लेखोर मुलगा-मुलगी खोलीत गेले होते. तिथे ते चहा प्यायले आणि मग पनीरदेखील मागवल्याचं बोललं जात आहे.

पनीर खात असताना त्यांनी पिस्तुलं काढली आणि गोळीबार सुरू केला. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.