राहुल द्रविडमुळे एक त्रिशतक हुकलं; Virender Sehwagचा गंभीर आरोप

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा जगातला सर्वात विध्वंसक फलंदाज असल्याचा दावा केला जातो. त्याची फलंदाजी करण्याची स्टाईलच निराळी होती. त्यामुळेच प्रतिस्पर्धी गोलंदाजांना त्याचं वादळ रोखणं अनेकदा अवघड गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

क्रिकेटचा फॉरमॅट कोणताही असो, सेहवागची बॅट ही तळपते ती स्फोटक अंदाजातच. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन तिहेरी शतकं नावावर असलेला तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.

पण, सेहवाग तिसऱ्या त्रिशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. पण, अवघ्या 7 धावांनी ते त्रिशतक हुलकं आणि तो 293 धावांवर बाद झाला. या तिहेरी शतकाच्या हुलकावणीला सेहवागनं दी वॉल राहुल द्रविडला जबाबदार धरले.

एका टॉक शोमध्ये बोलताना सेहवागनं हा दावा केला. राहुल द्रविड नेहमीच सहकारी फलंदाजाला समजवायचा आणि विकेट फेकू नकोस, असा सल्ला द्यायचा.

यावेळी सेहवागनं 2009च्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याची आठवण करून दिली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता.

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 284 धावांवर असणाऱ्या सेहवागला द्रविडनं नाबाद राहण्याचा सल्ला दिला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायला 3-4 षटकंच होती आणि तेव्हा द्रविडनं नाबाद राहण्याचा सल्ला दिला.

राहुलनं हा सल्ला दिला नसता तर मी त्रिशतकासाठीच्या 16 धावा त्या 3-4 षटकांत सहज करू शकलो असतो, असे सेहवाग म्हणाला. पण, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेहवाग 284 धावांवर, तर द्रविड 62 धावांवर नाबाद होता.

तिसऱ्या दिवसाच्या चौथ्या षटकार सेहवागची विकेट पडली. सेहवाग 254 चेंडूंत 40 चौकार व 7 षटकार खेचून 293 धावांत माघारी परतला.

या सामन्यात त्रिशतक झळकावलं असतं तर सचिन तेंडुलकरनं मला इच्छा पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं. पण, तेही पूर्ण होऊ शकले नाही आणि अजूनही त्याची खंत वाटते, असे सेहवागनं सांगितले.

सेहवागनं 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 104 कसोटीत 49.34च्या सरासरीनं 8586 धावा, तर 251 वन डे सामन्यांत 8273 धावा केल्या आहेत.