Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!

त्यावर कपिल देव यांनी एबीपी न्यूजला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,''भारताला पैशांची गरज नाही. त्यामुळे अशी मालिका खेळवायला नको आणि क्रिकेटपटूंचं जीव कशाला धोक्यात घालायचा? त्यामुळे निवांत राहा आणि घरीच थांबा. एकाचाही जीव धोक्यात घालायचं संकट का ओढावून घ्यायचे? त्यामुळे अशा सल्ल्याची गरज नाही. प्रशासन योग्य काम करत आहे.''

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी निधीची गरज आहे आणि त्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात तीन वन डे क्रिकेट सामन्यांची मालिका खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या डोक्यात ही कल्पना आली होती.

या मालिकेतून उभा राहणाऱ्या निधीचं दोन्ही देशांत समसमान वाटप करावं, असंही तो म्हणाला होता. त्यावरून सध्या वातावरण तापलेले आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अख्तरचा समाचार घेतला.

त्यानंतर अख्तरच्या बचावासाठी पाकचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी समोर आला. त्यानंतर भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी कपिल देव यांना पाठींबा दिला. यात आता पुन्हा अख्तरनं उडी घेत गावस्करांना प्रत्युत्तर दिले आहे.

शोएब म्हणाला होता की,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील. या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल.''

त्यावर आफ्रिदीनं प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,''शोएब अख्तरनं मानवतेच्या दृष्टीनं तो प्रस्ताव ठेवला होता. कपिल देव यांच्या विधानानं मला धक्का बसला, कारण मी असे व्हिडीओ पाहतोय की भारतातील लोकं कचऱ्याच्या डब्ब्यातून अन्न गोळा करत आहेत आणि खात आहेत. कपिल देव यांनी ते विधान करायला नको होतं.''

त्यानंतर गावस्कर यांनी कपिल देव यांना पाठींबा दर्शवला. ते म्हणाले, लाहोरमध्ये बर्फ पडू शकतो, परंतु भारत- पाकिस्तान मालिका होऊ शकत नाही.''

गावस्कर यांच्या या वक्तव्यावर अख्तरनं पुन्हा ट्विट केलं. तो म्हणाला, सन्नी भाई गेल्यावर्षी लाहोरमध्ये बर्फ पडला होता. त्यामुळे अशक्य काहीच नाही.