RCB vs SRH Latest News : मैदानावर उतरण्यापूर्वीच RCBनं चाहत्यांना जिंकले; क्रीडाविश्वातूनही होतंय कौतुक

विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या ( Royal Challengers Bangalore) जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला सोमवारपासून प्रारंभ करणार आहे. कामगिरीत सातत्य राखणाऱ्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) त्यांची गाठ पडणार आहे.

उभय संघांत आक्रमक फलंदाजांचा समावेश असून काहीजण एकट्याच्या बळावर सामन्याचा निकाल पलटवण्यास सक्षम आहेत. कोहलीची गेल्या काही मोसमातील कामगिरी शानदार ठरली आहे.

स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या संघात ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार अ‍ॅरोन फिंच जुळल्यामुळे फलंदाजीची बाजू अधिक मजबूत झाली आहे.

युवा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कल याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे. पण या सामन्यात RCB एका वेगळ्याच जर्सीत दिसणार आहे.

विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघ Indian Premire League ( IPL 2020) जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची IPL भारताबाहेर म्हणजेच संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्यात येत आहे.

19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत UAEत ही स्पर्धा होणार आहे. पण, या लीगमध्ये RCBसंघ कोरोना वॉरियर्सचा अनोख्या पद्धतीनं सन्मान करणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत RCBच्या खेळाडूंच्या जर्सीवर 'My Covid Heros' असे लिहिलेले पाहायला मिळणार आहे.

विराट म्हणाला की,''या स्तुत्य उपक्रमात एक टीम म्हणून आम्ही प्रथमच सहभागी होत आहोत. कोरोना व्हायरसच्या संकटात ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांची सेवा केली, हा उपक्रम त्यांना समर्पित आहे. RCBकडून आम्ही त्यांना सलाम करतो. ही जर्सी परिधान करताना, आम्हालाच अभिमान वाटत आहे.''

तो पुढे म्हणाला,'' त्यांनी ज्या आव्हानांचा सामना केलाय, त्याचा विचारही आपण करू शकत नाही. मागील सात महिने मी माझ्या सोसायटीत दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाहतोय. त्यांच्याकडून मलाही बरेच काही शिकायला मिळाले. त्यांच्याकडे पर्याय होता, परंतु त्यांनी कामापासून पळ काढला नाही.''

चेअरमन संजीव चूडीवाला यांनी सांगितले की,''खेळाडू संपूर्ण स्पर्धेदरम्यान आणि सरावातही ही जर्सी घालणार आहेत. पहिल्या सामन्यातील जर्सींचे लिलाव होणार आहे आणि त्यातून उभा राहणारा निधी 'Give India Foundation'ला दिला जाईल.''