सॅम करणच्या फलंदाजीचं कौतुक करत विरेंदर सेहवागचा 'इंग्रजांना टोला'

इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवता मालिका जिंकली. त्यानंतर, टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत असून इंग्लडच्या सॅम करणच्या खेळीचंही अनेकांनी कौतुक केलंय. विरेंदर सेहवागनेही सॅमचं कौतुक केलं असून इंग्लंड संघाला टोला लगावला.

इंग्लंडविरुद्ध अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने मालिकाही जिंकली.

दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने गोलंदाजांना दिले आहे.

सामन्यात चांगली कामगिरी करणारा शार्दुल ठाकूर ( Shardul Thakur) आणि संपूर्ण मालिकेमध्ये भेदक गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमार (Bhubaneswar Kumar)याला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले.

रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने झुंजार खेळ केला. मात्र अखेरच्या क्षणी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, या सामन्यात नाबाद ९५ धावांची खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या सॅम करणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

पहिल्या दोन सामन्यात तुफानी फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे, विराट कोहलीसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, जेव्हा दोन आघाडीचे संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा ते सामना अटीतटीचे होतात. सॅम करणने खूप चांगली खेळी केली. मात्र आमच्या गोलंदाजांनी सातत्याने बळी टिपले.

शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि नटराजन यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही काही झेल सोडले, ही बाब निराशाजनक होती. मात्र असे असले तरी अखेरीस आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो.

शार्दुल ठाकूरला सामनावीर आणि भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार मिळाला नाही, याचे मला आश्चर्य वाटले. सर्वात जास्त श्रेय हे गोलंदाजांनाच आहे कारण त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.

सॅम करणच्या खेळीचे नेटीझन्सनेही कौतुक केले आहे. भारतीय संघाचा माजी तडाखेबाज फलंदाज विरेदर सेहवागनेही सॅम करणच्या फलंदाजीचं कौतुक केलंय. सॅमने मजबूत खेळ करत इंग्लंडला शेवटपर्यंत सामन्यात जिवंत ठेवले, असे सेहवागने म्हटले.

सेहवागने सॅमचे कौतुक करत, इंग्लंडला टोलाही लगावला. अखेर, खाली हात आये थे, खाली हात जायेंगे इंग्लंडवाले.. असा टोला सेहवागने इंग्रजांच्या टीमला लगावला.

सेहवागने ट्विट करुन टीम इंडियाचं अभिनंदन केलंय, तसेच ही मालिका सगळ्याच फॉरमटमध्ये अतिशय चुरशीची झाल्याचंही सेहवागने म्हटले.