IPL 2021: गेल्या वर्षी CSKचं नेमकं काय चुकलं?, महेंद्रसिंग धोनीनं अगदी सोप्या शब्दात सांगितलं...

IPL 2021: आयपीएलमध्ये यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा संघ दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पण हाच संघ गेल्यावर्षी प्ले-ऑफपर्यंतही पोहोचून शकला नव्हता. धोनीनं यामागचं कारण आता स्पष्ट केलंय. जाणून घेऊयात...

आयपीएलचं १४ वं सीझन सुरू आहे आणि यावेळी गुणतालिकेत महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ अव्वल स्थानावर आहे. पण याच संघानं गेल्या वर्षी क्रिकेट चाहत्यांची निराशा केली होती. २०२० साली यूएईमध्ये खेळविण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेत सीएसकेला प्ले-ऑफमध्येही जागा मिळवता आली नव्हती.

आयपीएल स्पर्धेत प्ले-ऑफपर्यंत चेन्नईचा संघ पोहोचला नाही असं गेल्या वर्षी पहिल्यांदाच घडलं आणि धोनीच्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. पण यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईचा संघ गेल्यावर्षीची भरपाई भरुन काढताना दिसतोय. CSK नं आतापर्यंत ६ सामने खेळले असून यातील ५ सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे.

आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं नेमकं काय चुकलं? संघ नेमका कुठे कमी पडला? याची उत्तरं आता धोनीनं दिली आहेत.

स्पर्धेच्या सुरुवातीलाच तुम्ही व्यवस्थित जम बसवता तेव्हा सारंकाही ठीक होतं. गेल्या वर्षी पाच ते सहा महिने क्रिकेटपासून दूर होतो. कशाचीच परवानगी नव्हती. तुम्ही स्वत: मैदानात जा आणि सराव करा असा कधीच सराव होत नसतो. त्यामुळे खूप अडचणी होत्या, असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

यंदाही जरी निर्बंध असले तरी क्वारंटाइनच्या पद्धतीत आणि नियमांमध्ये गेल्यावर्षी पेक्षा खूप बदल आहे. गेल्यावर्षी यंदाच्या तुलनेत बराच वेळ क्रिकेटपासून दूर होतो. अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, असंही धोनी पुढे म्हणाला.

एकंदर एका वाक्यात जर सांगायचं झालं तर यंदा संघातील प्रत्येक खेळाडू गेल्यावर्षाहून अधिक जबाबदारीनं खेळतोय. तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जात असता पण सरतेशेवटी तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा आणखी १० टक्के जास्त योगदान कसं देता येईल यावर मेहनत करता तेव्हा यश नक्कीच मिळतं, असं धोनीनं सांगितलं.

संघातील खेळाडूंमध्ये फार बदल न केल्याबाबतही धोनीनं त्याचं मत व्यक्त केलं. "गेल्या ८ ते १० वर्षांमध्ये आम्ही संघातील खेळाडूंमध्ये जास्त बदल केले नाहीत. त्यामुळे खेळाडूंचा दृष्टीकोन सकारात्मक राहातो. याशिवाय ज्या खेळाडूंना संघात संधी मिळालेली नाही त्यांचही कौतुक करायला हवं. कारण ड्रेसिंग रुममध्ये तुम्ही वातावरण कसं ठेवता यावरही खूप काही अवलंबून असतं, असं धोनी म्हणाला

चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रुममध्ये सकारात्मक ऊर्जा देणारं वातावरण असतं आणि खेळाडूंमध्येही खेळीमेळीनं सहजतेनं चर्चा घडत असतात. ड्रेसिंग रुममधलं वातावरण चांगलं राहणं हे फार महत्वाचं असतं. ती सोपी गोष्ट नाही. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूचं यात योगदान असल्याचं धोनीनं म्हटलं आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज संघानं यंदाच्या सीझनमध्ये सुरुवातीचा सामना गमावला. त्यानंतर जोरदार कमबॅक करत सलग चार सामने जिंकले आहेत. तेही उत्तम धावांच्या फरकानं विजय प्राप्त केला आहे. त्यामुळेच संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

चेन्नईनं कालच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विजय प्राप्त केला. शनिवारी याच स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्जची मुंबई इंडियन्स विरुद्ध लढत होणार आहे.