यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेईपर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) घेतली आहे. शुक्रवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत तसा निर्णय घेतला गेला.

''आयपीएल मुंबई-पुणे किंवा यूएईत खेळवणे, अशा दोन्ही प्रस्तावांवर चर्चा झाली. सरकारच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आयसीसीनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित केल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक होईल आणि निर्णय घेतला जाईल.''असेही सूत्रांनी सांगितले.

पण, आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबद्दल भारतीय सरकारसमोर बीसीसीआय दोन प्रस्ताव पाठवणार आहेत. केंद्राच्या नियमांचं पालन करून लीग खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

केंद्र काय निर्णय घेतो, यानंतर लीग देशात खेळवायची की परदेशात, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आतापर्यंत संयुक्त अरब अमिराती ( यूएई) हे नाव आयपीएल 2020च्या आयोजनासाठी आघाडीवर होतं. तेथे सर्व खेळाडूंना प्रवास करणं सोयीचं असेल.

''आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी दुबई सोयीचं ठरणारं आहे. भारताच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना दुबईत येणं सोपं आहे,''असे सूत्रांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले.

एकाच दिवशी अनेक सामने खेळवून ही लीग 30-40 दिवसांत खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता दुबईला पर्याय म्हणून महाराष्ट्राचं नाव पुढे येत आहे.

मुंबई आणि पुण्यात आयपीएलचे सामने खेळवण्यात येऊ शकतात, असाही प्रस्ताव पुढे आला आहे.

पण, देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रातच आहेत आणि अशा परिस्थितीत येथे आयपीएल खेळवणं मोठ्या जोखमीचं ठरेल. बीसीसीआय ही जोखीम घेण्यास तयार असली तरी त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून परवानगी मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

''आयपीएल मुंबई-पुणे किंवा यूएईत खेळवणे, अशा दोन्ही प्रस्तावांवर चर्चा झाली. सरकारच्या सल्ल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आयसीसीनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित केल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक होईल आणि निर्णय घेतला जाईल.''असेही सूत्रांनी सांगितले.

तत्पूर्वी,आयोजनासाठी यूएई सर्वात उपयुक्त स्थळ असून २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होऊ शकेल, असे बीसीसीआय सूत्रांचे मत आहे. दुबई स्पोर्ट्स सिटीचे क्रिकेट आणि स्पर्धा प्रमुख सलमान हनिफ यांनी आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आपल्या सुविधा सज्ज असल्याचे सांगून या चर्चेला बळ दिले आहे.