IND Vs NZ : टीम इंडियाचा कसून सराव अन् रिषभ पंतचा आराम...

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही विराट कोहलीच्या टीमनं बाजी मारली. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 133 धावांचं माफक लक्ष्य सहज पार केले.

टीम इंडियानं दुसरा सामना 7 विकेट्स राखून जिंकताना मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना 29 जानेवारीला हॅमिल्टन येथे होणार आहे.

कर्णधार विराट कोहलीनं आजच्या विजयानंतर लगेचच तिसऱ्या सामन्यासाठीचा संघ जाहीर केला. त्यामुळे या उद्या होणाऱ्या सामन्यात रिषभ पंतला संधी मिळेल की नाही, याचे उत्तरही मिळाले.

दुसऱ्या सामन्यानंतर विराट म्हणाला होता की,''रवींद्र जडेजाचं विशेष कौतुक करायला हवं. त्याला युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी सुरेख साथ दिली. त्यामुळे या विजयी संघात काही बदल करण्याची सध्यातरी मला गरज वाटत नाही. तिसऱ्या सामन्यातही याच विजयी संघासह मैदानावर उतरू.''

त्यामुळे रिषभ पंतला याही सामन्यात बाकावर बसून सामना पाहावा लागेल, हे पक्कं झालं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत रिषभला चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे मैदान सोडावे लागले होते.

त्याच्या जागी लोकेश राहुलनं यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडली होती आणि कोहलीनं न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही लोकेशवर जबाबदारी कायम राखली. त्यामुळे पंतला तंदुरुस्त असूनही सामना खेळता आलेला नाही.

असा असेल संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह