India vs Australia : अरे आवाज कुणाचा.... टीम इंडियानं जग जिंकलं; कोणत्याच संघाला जमला नाही हा भीमपराक्रम

India vs Australia, 2nd T20I: भारतीय संघानं वन डे मालिकेतील पराभवाचा वचपा ट्वेंटी-20 मालिकेत काढलाच.. हार्दिक पांड्यानं ( Hardik Pandya) पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी करताना टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुकर बनवला.

ऑस्ट्रेलियाच्या १९४ धावांचा पाठलाग करताना लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहली व हार्दिकच्या फटकेबाजीनं सामनाच फिरवला.

भारतानं सहा विकेट्स राखून विजय मिळवताना तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयासह भारतानं आतापर्यंत कोणत्याच संघाला न जमलेला भीमपराक्रम केला.

फिंचच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी मिळालेल्या मॅथ्यू वेडनं चांगली पार पाडली. वेडनं ३२ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ५८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं १३ चेंडूंत २ षटकारांसह २२ धावा केल्या. मोइजेस हेन्रीक्स याच्यासह स्मिथनं ४७ धावा जोडल्या.

स्मिथ ३८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून ४६ धावांवर युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. हेन्रीक्सही 18 चेंडूंत 26 धावा करून टी नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नटराजननं 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं 5 बाद 194 धावा केल्या.

प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. राहुल २२ चेंडूंत २ चौकार व १ षटकार मारून ३० धावांवर झेलबाद झाला.

अॅडम झम्पानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार मारून ५२ धावा करणाऱ्या धवनला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. विजयासाठी ४६ धावांची गरज असताना डॅनिएल सॅम्सनं ऑसींना मोठी विकेट मिळवून दिली.

विराट २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ४० धावांत माघारी परतला. हार्दिक व श्रेयस अय्यरनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करून सामन्यासह मालिकाही खिशात घातली. हार्दिक २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर, तर अय्यर ५ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते.

टीम इंडियाने गेल्या वर्षी डिसेंबरपासून एकही टी-२० लढत गमावलेली नाही. सलग सर्वाधिक ट्वेंटी-२० लढती जिंकण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २०१८ ते २०१९ या कालावधीत १२ लढती जिंकल्या. यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१७ या काळात सलग ११ सामन्यात विजय मिळवला होता.

भारताचा हा सलग सहावा ट्वेंटी-20 मालिका विजय आहे. पाच वेगवेगळ्या देशांना सलग ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत करणारा भारत हा पहिलाच देश आहे.

शिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे.

भारताची मागील सात ट्वेंटी-२० मालिकेतील अपराजीत कामगिरी - वेस्ट इंडिज ( वि. ३-०), दक्षिण आफ्रिका ( बरोबरीत १-१), बांगलादेश ( वि. २-१), वेस्ट इंडिज ( वि. २-१), श्रीलंका ( वि. २-०), न्यूझीलंड ( वि. ५-०), ऑस्ट्रेलिया ( वि. २-०).