ICC Women's T20 World Cup: टीम इंडिया पावसामुळे नाही तर स्वकर्तृत्वामुळे फायनलमध्ये पोहोचली!

ICC Women's T20 World Cup : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी) आली आहे. सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे सामना रद्द करावा लागला. त्यामुळे अ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे.

भारतानं अ गटात 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते आणि त्याच जोरावर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का झाला. भारतीय संघाच्या अंतिम प्रवेशानंतर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण, त्याचवेळा पावसानं टीम इंडियाला वाचवलं असाही सूर आवळला जात आहे.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामने झाले आणि पाचही सामन्यांत भारतीय महिलांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पावसानं टीम इंडियाला वाचवले, असे बोलले जात आहे. पण, टीम इंडियाला पावसाने नाही, तर स्वकर्तृत्वाने फायनलचं तिकीट मिळवून दिलं आहे.

आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामना पावसामुळे रद्द झाल्यास गटात ज्याचे गुण जास्त तो अंतिम फेरीत प्रवेश करेल, हा आयसीसीचा नियम. त्यानुसार टीम इंडियानं अंतिम फेरीत धडक दिली.

भारतीय संघानं अ गटातील सर्व चारही सामने जिंकून 8 गुणांची कमाई केली. दुसरीकडे ब गटात इंग्लंडला चारपैकी तीन सामने जिंकता आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना हार पत्करावी लागली होती.

भारतीय महिला संघानं अ गटातील पहिल्याच सामन्यात जेतेपदाचे प्रबळ दावेदार ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चाखवली. दीप्ती शर्माची ( 49*) फटकेबाजी आणि पूनम यादव ( 4 विकेट्स) व शिखा पांडे ( 3 विकेट्स) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं 17 धावांनी विजय मिळवला.

टीम इंडियानं दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 18 धावांनी विजय मिळवला. शेफाली वर्मा ( 39), जेमिमा रॉड्रीग्ज ( 34), पूनम यादव ( 3 विकेट्स) आणि शिखा पांडे ( 2 विकेट्स) यांनी हा विजय मिळवून दिला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना चुरशीचा झाला. पण, टीम इंडियानं अखेरच्या षटकात अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. शेफाली वर्मानं 46 धावांची तुफानी खेळी केली. या विजयासह टीम इंडियानं उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

चौथ्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून टीम इंडियानं गटातील अव्वल स्थान पक्के केले. राधा यादव ( 4 विकेट्स) आणि शेफाली वर्मा ( 47) यांनी हा विजय मिळवून दिला.

त्यामुळे टीम इंडियानं चारही सामने जिंकून आपली बाजू भक्कम केली होती आणि त्या मेहनतीचे फळ आज त्यांना उपांत्य फेरीत मिळाले.