ICC T20 World Cup 2021: T20 World Cupमधील ते अविस्मरणीय क्षण, जेव्हा रोखले गेले होते क्रिकेटप्रेमींचे श्वास

ICC T20 World Cup 2021: टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकाराची लोकप्रियता वाढतच आहेत. टी-२० विश्वचषकातील काही अविस्मरणीय क्षणांचा घेतलेला हा आढावा.

आज आयपीएलचा हंगाम आटोपल्यानंतर येत्या १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. तेव्हापासून क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकाराची लोकप्रियता वाढतच आहेत. टी-२० विश्वचषकातील काही अविस्मरणीय क्षणांचा घेतलेला हा आढावा.

टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या हंगामात असे काही घडले होते की, जे आतापर्यंत पुन्हा घडलेले नाही. या विश्वचषकात भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले होते. एका षटकात सहा षटकार ठोकले गेल्याची ही टी-२० विश्वचषकातील आतापर्यंतची एकमेव घटना आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता.

२००७ च्या विश्वचषकात भारताने विजय मिळवला होता. पाकिस्तानविरुद्ध झालेला अंतिम सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला होता. या सामन्यात अखेरच्या षटकामध्ये पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज असताना मिसबाह उल हकने षटकार ठोकत पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. मात्र पुढच्याच चेंडूवर मिसबाह उल हक एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला आणि भारताचे नाव पहिल्या वहिल्या टी-२० विश्वचषकावर कोरले गेले.

२००७ मध्ये भारताने पाकिस्तानला अंतिम फेरीत नमवले होते. त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या दुसऱ्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचला. यावेळी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत श्रीलंकेने २० षटकात १३८ धावा जमवल्या. त्यानंतर शाहीद आफ्रिदीच्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

पुढे श्रीलंकेडचा संघ २०१४ मध्ये विजयी झाला. श्रीलंकेने भारताला हरवून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत श्रीलंकेचा न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना अविस्मरणीय ठरला. या सामन्यात अवघ्या ११९ धावांचा बचाव करताना रंगना हेराथने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने विजय मिळवला.

२०१६ च्या टी-२० विश्वचषकामध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात झालेला सामनाही अविस्मरणीय ठरला होता. त्या सामन्यात अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी १९ धावांची गरज असताना बेन स्टोक्सला चार षटकार ठोकत कार्लोस ब्रेथवेटने वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला होता. वेस्ट इंडिजचा हा सलग दुसरा विश्वचषक विजय होता.