भारतातील लोकांना कचऱ्यातून अन्न निवडून खाताना पाहतोय; शाहिद आफ्रिदीनं ओलांडल्या मर्यादा

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर पुढे आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीनं या संकटाशी सामना करण्यासाठी सरकारला मदत करत आहे.

याच संकटाशी मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिकेचे आयोजन करून निधी गोळा करावा, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं ठेवला होता.

तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतून जमा होणारा निधी दोन्ही देशांत समासमान वाटप केला जावा, असा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता.

त्याच्या या प्रस्तावाचा भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी चांगलाज समाचार घेतला. भारताला पैशांची गरज नाही, त्यामुळे खेळाडूंचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांनी मांडले.

शोएब अख्तरवर टीका होताना पाहून पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी पुढे आला. त्यानं कपिल देव यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

कपिल देव यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना आफ्रिदीनं केलेलं विधान धक्कादायक अन् सर्व मर्यादा ओलांडणारं ठरलं.

शोएब म्हणाला होता की,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील. या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल.''

त्यावर कपिल देव यांनी एबीपी न्यूजला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,''भारताला पैशांची गरज नाही. त्यामुळे अशी मालिका खेळवायला नको आणि क्रिकेटपटूंचं जीव कशाला धोक्यात घालायचा? त्यामुळे निवांत राहा आणि घरीच थांबा. एकाचाही जीव धोक्यात घालायचं संकट का ओढावून घ्यायचे? त्यामुळे अशा सल्ल्याची गरज नाही. प्रशासन योग्य काम करत आहे.''

त्यावर आफ्रिदीनं प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला,''शोएब अख्तरनं मानवतेच्या दृष्टीनं तो प्रस्ताव ठेवला होता. कपिल देव यांच्या विधानानं मला धक्का बसला, कारण मी असे व्हिडीओ पाहतोय की भारतातील लोकं कचऱ्याच्या डब्ब्यातून अन्न गोळा करत आहेत आणि खात आहेत. कपिल देव यांनी ते विधान करायला नको होतं.''

दरम्यान, आफ्रिदीनं यावेळी भारतीय सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. पाकिस्तानला नेहमी भारताविरुद्ध क्रिकेट खेळायचे आहे, परंतु सध्या मोदी सरकारमध्ये प्रचंड नकारत्मकता आहे आणि त्यामुळे द्विदेशीय मालिका होणे अवघड आहे. पाकिस्तान सकारात्मक दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकत आहे आणि भारताकडूनही तिच अपेक्षा आहे, असे आफ्रिदीनं सांगितलं. PakPassionशी बोलताना तो म्हणाला,''भारताविरुद्ध आम्हाला खेळायचे आहे, परंतु मोदी सरकार असल्यानं प्रचंड नकारात्मकता त्यांच्याकडून येत आहे. त्यामुळे ते शक्य नाही.''