गॅबावर टीम इंडियानं वर्ल्ड रेकॉर्ड केला; ३२ वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाने हार मानली!

India vs Australia, 4th Test Day 5 : टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. प्रमुख खेळाडू जायबंदी होत असताना अजिंक्यनं मोठ्या कौशल्यानं सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीनं कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला. शुबमन गिल ( Shubman Gill), रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियानं ठेवलेले ३२८ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं ३ विकेट्स राखून पार केले.

३२८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ७) माघारी परतल्यानंतर शुबमन गिल ( ९१) व चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. गिल १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावांवर बाद झाला. ऑसी गोलंदाजांचा वेगवान चेंडू शरिरावर झेलूनही पुजारा अभेद्य भींतीप्रमाणे उभा राहिला.

कर्णधार अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी करताना टीम इंडियाच्या विजयासाठी प्रयत्न केले, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. रहाणे २२ चेंडूंत २४ धावांत माघारी परतला. रिषभ पंतला बढती देण्यात आली, पण त्यानेही दमदार खेळी केली. पुजारानं चौथ्या विकेटसाठी पंतसह अर्धशतकी भागीदारी केली.

नवीन चेंडू घेतल्यानंतर पॅट कमिन्सनं पहिल्याच षटकात पुजाराची विकेट घेतली. अम्पायर कॉलमुळे पुजाराला २११ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं ५६ धावांवर माघारी जावे लागले. त्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाच्या विजयासाठीचे प्रयत्न केले.

पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी १५ षटकांचा खेळ शिल्लक करताना टीम इंडिया बाजी मारेल असा विश्वास वाटत होता. पण, मयांक अग्रवालच्या विकेटनं ऑस्ट्रेलियन संघाला बूस्ट मिळवून दिला. मयांक ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ व वॉशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवत सामना जिंकला. या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली.

भारतानं ही मालिका २-१अशी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखली. टीम इंडियानं गॅबा कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर चषक ( Border–Gavaskar Trophy) सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे ठेवला. २०१७ ( भारत) आणि २०१८-१९ मध्ये भारतानं २-१ अशी मालिका जिंकली होती. २०२०-२१मध्ये मालिका १-१अशी बरोबरीत सोडवून बॉर्डर-गावस्कर चषक स्वतःकडे ठेवला.

३२ वर्षांत गॅबावर ऑस्ट्रेलियाला एकही पराभव पत्करता आला नव्हता आणि टीम इंडियानं त्यांची ही मालिका खंडीत केली.

ऑस्ट्रेलियात चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा पाठलाग करतानाही टीम इंडियानं विक्रम केला. या यादीत टीम इंडियानं तिसरे स्थान पटकावले. टीम इंडियानं आशिया खंडाबाहेर प्रथमच ०-१ अशा पिछाडीवरून कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

शिवाय दक्षिण आफ्रिकेनंतर ( २००९-०८, २०१२-१३ आणि २०१६-१७) ऑस्ट्रेलियात सलग कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला.