10 साल बाद ! विश्वविजेत्या भारतीय संघाचे 'हॅप्पी अँड इमोशनल' क्षण

मुथय्या मुरलीधरनचा सामना करण्यासाठी कर्णधार धोनीनं स्वतःला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला प्रमोशन दिलं. धोनीचा हा डाव यशस्वी ठरला. धोनीनं ७९ चेंडूंत नाबाद ९१ धावा चोपल्या. नुवान कुलसेकरानं टाकलेल्या ४९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला अन् एकच जल्लोष झाला.

२ एप्रिल २०११, ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत... कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं मारलेल्या खणखणीत षटकारानंतर मुंबईचं वानखेडे स्टेडियम जल्लोषानं दणाणून निघालं होतं. आज त्या दिवसाला १० वर्ष पूर्ण होत आहेत.

२८ वर्षांनंतर टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला... सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचं वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न संपूर्ण संघानं मिळून पूर्ण केलं होतं.

जेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यानंतर खेळाडूंनी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून स्टेडियमला मारलेली प्रदक्षिणा आजही आठवली की मन भावनिक होतं.

तेव्हापासून सचिनचा भार विराटने आपल्या खांद्यावर उचलला आहे. २८ वर्षानंतर टीम इंडियानं दुसऱ्यांदा वन डे वर्ल्ड कप जिंकला अन् कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं

अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर सलग दोन वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीलंकेचं आव्हान होतं. घरच्या मैदानावर कोणत्याच संघाला जेतेपद पटकावता न आल्याचा इतिहास होता.

त्यामुळे भारतीयांच्या पोटात गोळाच आला होता. वर्ल्ड कप फायनलमध्ये फक्त दोन वेळाच धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला होता.

ज्या संघातील खेळाडूनं शतक झळकावलं तो कधीच हरला नव्हता. ही सर्व आकडेवारी चूकीची ठरवून टीम इंडियानं जेतेपद उंचावले होते.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीर ( Gautam Gambhir) खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. त्यानं ९७ धावांची जबरी खेळी केली.

गौतम गंभीरही ही खेळीच भारतीय संघाच्या विजयात मोलाची ठरली, त्यामुळेच टीम इंडियाचा विजय सोप्पा झाला होता.

मुथय्या मुरलीधरनचा सामना करण्यासाठी कर्णधार धोनीनं स्वतःला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला प्रमोशन दिलं. धोनीचा हा डाव यशस्वी ठरला. धोनीनं ७९ चेंडूंत नाबाद ९१ धावा चोपल्या. नुवान कुलसेकरानं टाकलेल्या ४९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला अन् एकच जल्लोष झाला.

देशभरात एप्रिल महिन्यातच दिवाळी साजरी करण्यात आली, बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी टीम इंडियासह विश्वचषक उंचावला अन् इतिहास त्याचा साक्षी झाला.