धक्कादायक! कपिल शर्मा करणार होता आत्महत्या; शाहरुखमुळे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 12:22 PM2021-11-07T12:22:21+5:302021-11-07T12:27:57+5:30

Kapil sharma: एकेकाळी कधीही टीव्हीवर कोणताही कार्यक्रम करता येणार नाही, असं म्हणत आत्मविश्वास गमावलेल्या कपिलने आत्महत्येचा निर्णय घेतला होता.

कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं तर त्यात यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या आयुष्यात आलेले अप्स अॅण्ड डाउन्स अनेकांनी पाहिले आहेत. विशेष म्हणजे करिअरमध्ये अपयश आलेल्या अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलदेखील उचललं आहे. असाच काहीसा प्रकार प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्यासोबत झाला आहे.

एका मुलाखतीत कपिल शर्माने त्याच्या करिअरच्या पडत्या काळाविषयी भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर नैराश्यात येऊन त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला होता.

एकेकाळी कधीही टीव्हीवर कोणताही कार्यक्रम करता येणार नाही, असं म्हणत आत्मविश्वास गमावलेल्या कपिलने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. परंतु, अभिनेता शाहरुख खानमुळे (Shah Rukh Khan) त्याचे प्राण वाचले.

"मला पूर्वी मद्यपान करण्याची प्रचंड सवय लागली होती. ही सवय इतकी वाईट होती की माझं कामाकडे दुर्लक्ष झालं होतं. ज्यामुळे माझ्या करिअरचा आलेख खालती उतरत चालला होता. परंतु, त्यावेळी शाहरुखमुळे मी पुन्हा मार्गी लागलो", असं कपिल म्हणाला.

"शाहरुखच्या मार्गदर्शनामुळेच मी इथवर पोहोचलो आहे. 'फिरंगी'च्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखने मला मानसिक आणि शारीरिकरित्या योग्य मार्गदर्शन केलं. ज्यामुळे मद्यपान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीतीमधून मी बाहेर निघू शकलो."

प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केल्यामुळे कपिल नैराश्यात गेला होता. ज्यामुळे एकदा स्टेजवर परफॉर्मेंस करणंही त्याला जमत नव्हतं. त्यामुळे त्याने त्याच्या पाळीव श्वानासोबत स्वत:ला ऑफिसमध्ये कोंडून घेतलं होतं. त्याच्या या वागण्यामुळे लोकांनी त्याच्या शोकडे पाठ फिरवली होती.

कपिलची दिवसेंदिवस खालावलेली शारीरिक व मानसिक स्थिती पाहता त्याच्या एका मित्राने त्याला सी-फेसजवळ असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे समुद्राचं निळशार पाणी आणि ताजी हवा यामुळे त्याचा मूड चांगला होईल.

परंतु, खिडकीतून समुद्र पाहिल्यावर कपिलला त्या समुद्रात जीव देण्याची इच्छा निर्माण झाली होती. परंतु, या सगळ्यातून शाहरुखने त्याला बाहेर काढलं.

नैराश्यातून बाहेर पडलेला कपिल आज हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय कॉमेडियन म्हणून ओळखला जातो. 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांच अफाट मनोरंजन करत आहे. (फोटो सौजन्य: कपिल शर्मा फेसबुक पेज)