TATA ची कमाल! ‘या’ कंपनीकडून वर्षभरात १ लाख रोजगार; येत्या ३ महिन्यात ३० हजार नोकऱ्या देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:09 PM2022-01-18T15:09:07+5:302022-01-18T15:14:13+5:30

टाटाच्या या कंपनीसह इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्याही मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार आहेत. पाहा, डिटेल्स...

कोरोना संकटात अनेक कंपन्या संकटात आल्या. लाखो रोजगार बुडाले. मात्र, त्यातून आता हळूहळू कंपन्या सावरत आहेत. खासगी क्षेत्रातील अनेकविध कंपन्या पुन्हा एकदा जोरदार नोकर भरती प्रक्रिया राबवत आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील कंपन्या मागे नाहीत.

TATA ग्रुपमधील एक आघाडीची कंपनी कमाल कामगिरी करत आहे. मागील तिमाहीत या कंपनीला मोठा नफा झाला. तसेच या कंपनीने नोकऱ्यांच्या बाबतीत अन्य कंपन्यांना मागे टाकत आघाडी मिळवली आहे.

TATA ग्रुपमधील ही कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS आहे. या कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कमाल कामगिरी कायम ठेवली. TCS ने याच कालावधीत ९ हजार ७६९ कोटी रुपयांचा नफा कमावला.

इतकेच नव्हे तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने सांगितले की, कंपनी आपली आक्रमक भरती मोहीम सुरू ठेवेल. कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड म्हणाले की, टीसीएसमध्ये नोकरभरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवली जाईल.

TCS मध्ये आताच्या घडीला ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये महिलांची संख्या २ लाखांवर आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षांत कंपनीने ५५ हजार नोकऱ्या देण्याचे टार्गेट ठेवले होते. पण, आतापर्यंत TCS ने जवळपास ७७ हजार नोकऱ्या दिल्या आहेत.

याशिवाय, TCS येत्या ३ महिन्यांच्या कालावधीत आणखी ३० हजार नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले जात आहे. याचाच अर्थ वर्षभरात TCS चा एकूण नोकरभरतीचा आकडा १ लाखांच्या जवळ जाईल. TCS देशातील एकमेव IT कंपनी असेल, जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रक्रिया राबवली गेली आहे, असे बोलले जात आहे.

TCS सह विप्रो आणि इन्फोसिस कंपन्याही मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार आहेत. इन्फोसिस ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी ५५ हजार किंवा यापेक्षा अधिक भरती करणार आहे. इन्फोसिसमध्ये आताच्या घडीला २ लाख ९२ हजार ०६७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३९.६ टक्के असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Wipro कंपनीकडूनही नोकरभरती केली जाणार आहे. विप्रो कंपनी सुमारे ३० हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. गेल्या तिमाहीत विप्रोने २ हजार ९७० कोटी रुपयांचा नफा कमावला. आताच्या घडीला विप्रो कंपनीत २ लाख ३१ हजार ६७१ कर्मचारी कार्यरत आहेत.

दरम्यान, TCS च्या संचालक मंडळाने १८ हजार कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक योजनेवरही मोहोर उमटवली. विद्यमान भागधारकांच्या हाती असलेल्या समभागांची प्रत्येकी ४,५०० रुपये किमतीला खरेदी केली जाणार आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आखलेल्या समभाग बायबॅक योजनेतून सर्वाधिक लाभ तिची सर्वात मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला होणार आहे. टाटा सन्सकडे TCS चे २६६.९१ कोटी समभाग असून, टाटा समूहातील सर्व कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या या कंपनीचा समभाग पुनर्खरेदी योजनेअंतर्गत २.८८ कोटी समभाग विक्री करण्याचा मानस आहे.

TATA समूहातील दुसरी कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडे १०,२३,६८५ समभाग आहेत, त्यापैकी ११,०५५ समभागांची विक्री ती करू इच्छित आहे. परिणामी TATA समूहातील दोन्ही कंपन्यांना TCS च्या १८ हजार कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतून १२,९९३.२ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी १८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान TCS ने जाहीर केलेल्या १६,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी योजनेतदेखील सहभागी होऊन TATA सन्सने ९,९९७.५ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले होते. शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२२ रोजी प्रवर्तक कंपन्यांची टीसीएसमध्ये ७२.१९ टक्के भागभांडवली हिस्सेदारी आहे.