महागडे होऊ शकतात व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅन्स; पाहा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:02 PM2021-02-16T17:02:36+5:302021-02-16T17:09:59+5:30

Vodafone Idea : २०२२ पर्यंत कंपनी देशभरात 3G सेवाही करणार बंद

व्होडाफोन आयडिया ही कंपनी आता संपूर्ण देशात 5G रेडी उपकरणं लावण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडियाचे मॅनेजिंग एडिटर आणि सीईओ रविंदर ठक्कर यांनी व्होडाफोन-आयडियाचं नेटवर्क 5G रेडी असल्याचं म्हटलं.

एकीकडे सर्व कंपन्या 5G रेडी नेटवर्क तयार करत आहेत. तर दुसरीकडे काही जाणकारांनी पुढील काळात टॅरिफ प्लॅन महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परंतु हे टॅरिफ प्लॅन कितीनं वाढतील याची मात्र अद्यापही माहिती देण्यात आली नाही. तसंच या रेसमध्ये व्होडाफोन आयडिया ही कंपनी पुढे राहू शकते असंही सांगण्यात आलंय.

प्रत्येक तिमाहीत कंपन्यांच्या एव्हरेज रेव्हेन्यू पर युझरमध्ये सुधारणा होत आहे.३१ डिसेंबर २०२० पर्यंत व्होडाफोन आयडियाचा ARPU २ रूपयांनी वाढून तो ११९ रूपयांवरून १२१ रूपयांवर गेला आहे.

व्होडाफोन आयडिया यावेळी सर्वप्रथम टॅरिफ प्लॅन महाग करू शकते असं म्हटलं जातं आहे. २०१९ मध्येही टॅरिफचे दर वाढवणारी ही पहिली कंपनी होती.

सध्या व्होडाफोन आयडियाला टॅरिफ वाढवण्याची आवश्यकता आहे. आर्थिक वर्ष २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान, कंपनीच्या महसूलात १ टक्क्याची वाढ झाली.

त्यानंतर कंपनीचा महसूल १०८.९ अब्ज रुपये इतका गेला. दरम्यान, टॅरिफ वाढल्यास कंपनीचा ARPU देखील वाढेल.

भारतात 5G सेवा आता सुरूवातीच्या टप्प्यात आहेत. परंतु कंपनी 5G रोलआऊट करण्यासाठी तयार असल्याचं व्होडाफोन आयडियाचं म्हणणं आहे.

तीन वर्षांच्या कठिण काळातून गेल्यानंतर व्होडाफोन आयडियासाठी मागील तिमाही चांगली ठरली.

दरम्यान, व्होडाफोन आयडिया आपलं संपूर्ण 3G नेटवर्क रोल आऊट करणार असून २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं रविंदर ठक्कर यांनी टेलिकॉम टॉकशी बोलताना सांगितलं.