KYC अपडेट करण्यासाठी फोन, मेसेज आलाय?, व्हा सावध; RBI ने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:49 PM2021-09-15T15:49:00+5:302021-09-15T16:05:22+5:30

KYC Updation : KYC अपडेशनच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून सावध राहण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केला अलर्ट.

रिझर्व्ह बँकेनं (RBI) सर्व बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात डिजिटल पेमेंट वाढल्याने फसवणुकीच्या घटनांमध्येही सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ट्वीट करत माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने KYC च्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी एक अॅडव्हाझरी जारी केली आहे. रिझर्व्ह बँकेनं ट्वीट करत ग्राहकांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं आहे.

आपलं लॉग इन, वैयक्तीक माहिती, केवायसीची कागदपत्रे, कार्डाची माहिती, पिन, पासवर्ड आणि ओटीपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच रिझर्व्ह बँकेनं आणखी एका ट्वीटमध्ये केवायसी अपडेशनची माहिती, कार्डाची माहिती, PIN किंवा OTP साठी करण्यात आलेले मेसेज, कॉल किंवा लिंकपासून सावध राहण्यास सांगितलं आहे.

केवायसी (Know Your Customer-KYC)अपडेट करण्याच्या नावाखाली बँक ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. फसवणूक करणारे यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. तुम्ही तुमचे कार्ड अत्यंत काळजीपूर्वक वापरा. एटीएम / डेबिट कार्डची (ATM/Debit card) माहिती कोणाशीही शेअर करू नका, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

ग्राहकांना कॉल, एसएमएस आणि ईमेल पाठवून वैयक्तिक माहिती शेअर करण्यास सांगितलं जात आहे. यामध्ये लॉगिन, कार्ड, पिन (PIN)आणि ओटीपी (OTP) यासंबंधी माहिती मागितली जाते. बँक ग्राहकांना लिंक पाठवून केवायसी अपडेट करण्यासाठी unauthorised किंवा unverified अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाऊ शकतं, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

एसएमएस आणि ईमेल पाठवून ग्राहकांना सांगितलं जात आहे की, जर त्यांनी केवायसी अपडेट केलं नाही तर त्यांचे अकाउंट ब्लॉक किंवा बंद केलं जाऊ शकते. अशा परिस्थितीत जर ग्राहकानं कॉल, मेसेज किंवा बेकायदेशीर अॅपवर त्याची माहिती शेअर केली तर फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या अकाउंटचा अॅक्सेस मिळेल आणि ते ग्राहकाची फसवणूक करू शकतील, असंही नमूद करण्यात आलं आहे.

नियमन केलेल्या संस्थांना वेळोवेळी केवायसी अपडेट करावे लागते, परंतु ही प्रक्रिया सोपी केली गेली आहे. जर एखाद्या ग्राहकाच्या अकाउंटची माहिती अपडेट करायची असेल तर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत त्याच्या अकाउंटवर कारवाई केली जाणार नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.