पाकिस्तानचा पाय आणखी खोलात; १.५ कोटी रोजगार धोक्यात, २ लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 04:10 PM2021-03-01T16:10:16+5:302021-03-01T16:15:04+5:30

पाकिस्तानची अर्थव्यवस्था बळकट करण्यामागे कापड उद्योगाचा मोठा वाटा आहे. याच कापड उद्योगाला आताच्या घडीला कापसाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत भारतातून कापूस आयात करण्यावर पाकिस्तान विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. (report says pakistan may resume import of cotton from india)

काश्मीर मुद्द्यांवरून भारतावर सतत कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंततरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला करड्या यादीत टाकले असून, आर्थिक दृष्ट्या पाकिस्तानची मोठी कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था बळकट करण्यामागे कापड उद्योगाचा मोठा वाटा आहे. याच कापड उद्योगाला आताच्या घडीला कापसाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत भारतातून कापूस आयात करण्यावर पाकिस्तान विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. (report says pakistan may resume import of cotton from india)

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ ने यासंदर्भात माहिती दिली आहे. पाकिस्तानकडून भारताला कापूस आयातीसाठी प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पाकिस्तानची कापसाची गरज पूर्ण करण्यासाठी भारताला मदतीचे आवाहन केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरात पाकिस्तानला १२ कोटी बेल्स कापसाची गरज भासते. मात्र, पाकिस्तान फक्त ७.७ कोटी बेल्स कापसाचे उत्पादन घेऊ शकणार आहे. पाकिस्तानला उर्वरित तूट भरून काढण्यासाठी ५.५ कोटी बेल्स कापूस आयात करावा लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तान हे देश शेजारील राष्ट्र आहेत. त्यामुळे दूरच्या देशांकडून आयात करण्यापेक्षा कापूस आयातीसाठी भारत हा योग्य पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानातील कापसाची आयात अमेरिका, ब्राझील, उझबेकिस्तान या देशांकडून केली जाते. मात्र, हा व्यवहार पाकिस्तानसाठी महागाचा ठरतो.

अन्य देशांमधून आयात केलेला माल पाकिस्तानमध्ये दाखल होण्यास तब्बल दोन महिने लागतात. हाच माल भारतातून आयात केल्यास त्यासाठी फक्त तीन ते चार दिवस लागतील. त्यामुळे भारतातून आयात करणे हे पाकिस्तानसाठी अनेकार्थाने उपयुक्त ठरणार आहे.

पाकिस्तानमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात पसरलेला असून, सुमारे ३० टक्के रोजगार फक्त वस्त्रोद्योगामुळे निर्माण होतो असा अंदाज आहे. कापूसनिर्मितीत भारत, बांग्लादेशनंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो.

पाकिस्तानच्या एकूण निर्यातीत ६० टक्के निर्यात वस्त्रोद्योगाशी निगडीत उत्पादनांची आहे. भारताशी आयात करार केला नाही तर, पाकिस्तानातील तब्बल १.५ कोटी रोजगार धोक्यात येऊ शकतात. तसेच दोन लाख कोटींचे नुकसानही होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आजच्या घडीलाही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संबंध अतिशय ताणलेले आहेत. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश केल्यापासून पाकिस्तान अनेकविध मार्गाने आपली नाराजी व्यक्त करत आहे.

पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करणे बंद केले. रेल्वेसेवाही बंद आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे सध्या दोन्ही देशांतील व्यापारविषयक व्यवहार ताणलेले आहेत. मात्र, मोठे नुकसान टाळण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला कापूस निर्यातीसाठी प्रस्ताव सादर करून विनंती केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.