...तर एटीएममधून काढता येणार फक्त 'इतकी'च रक्कम; लवकरच येणार नवा नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 08:15 AM2020-06-24T08:15:37+5:302020-06-24T08:21:58+5:30

कोरोना संकट, त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी यामुळे त्रस्त झालेल्या लोकांपुढे आता आणखी समस्या निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका समितीनं एटीएममधून पैसे काढण्यासाठी ५ हजारांची मर्यादा घालून देण्याची शिफारस केली आहे. याशिवाय एटीएम शुल्क वाढवण्याचाही सल्ला दिला आहे.

आरबीआयनं गेल्या वर्षी एटीएम देवाणघेवाण शुल्क रचनेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यांनी आपला अहवाल आरबीआयला दिला आहे.

मनीलाईफनं दिलेल्या वृत्तानुसार आरबीआयच्या एका समितीनं संपूर्ण देशात एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व व्यवहारांवरील देवाणघेवाण शुल्क वाढवण्याची शिफारस केली आहे.

एटीएममधून एकावेळी ५ हजार रुपयेच काढण्याची मर्यादा असावी आणि त्यापेक्षा जास्त रक्कम काढल्यास शुल्क आकारण्यात यावं, असं या समितीनं आरबीआयला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

१० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवरील देवाणघेवाण शुल्क २४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आरबीआयला सोपवण्यात आलेल्या अहवालात बँकेतून आणि एटीएममधून होणारे व्यवहार आणि त्यासाठी येणारा खर्च यांची तुलना करण्यात आली आहे. कोरोना संकट काळात एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहार बँक शाखेतून होणाऱ्या व्यवहारांच्या तुलनेत अधिक असल्याचं अहवालात नमूद कपण्यात आलं आहे.

लॉकडाऊन आणि कोरोना संकटामुळे १ जुलैपासून एटीएममधून रक्कम काढण्याचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडेल.

१ जुलैपासून एटीएममधून रोख रक्कम काढणं महाग होईल. एटीएममधून रोख काढताना आकारले जाणारे सर्व प्रकारचे व्यवहार शुल्क अर्थ मंत्रालयानं तीन महिन्यांसाठी हटवले होते.

कोरोना संकटाचा विचार करता अर्थ मंत्रालयानं एटीएममधून होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्क हटवून जनतेला दिलासा दिला होता. तीन महिन्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ३० जूनला हा तीन महिन्यांचा कालावधी संपणार आहे.

Read in English