“येत्या दशकात भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, विकास अधिक गतिमान होईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:12 AM2021-08-02T09:12:34+5:302021-08-02T09:17:36+5:30

गेल्या दीड वर्षांत केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या दहा वर्षांमध्ये भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोरोना संकटामुळे देशातील अर्थचक्र मंदावले असून, याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका उद्योग, व्यापार, व्यवसायांना बसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले.

दुसऱ्या लाटेतून हळूहळू देश सावरत असताना अर्थगती काहीशी वेगवान झाली असून, जुलै महिन्यात सर्वाधिक GST महसूल संकलनामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

इंधनदरवाढीमुळे महागाईचे प्रमाण वाढले असून, याचाही परिणाम होत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, येत्या काही वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था सुधारून जीडीपी ७ टक्क्यांनी वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना भारताची अर्थव्यवस्था आणि भविष्यातील वाटचाल यावर आपली स्पष्ट मते मांडली. यावेळी आगामी दशकात भारताचा GDP ७ टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.

कोरोनाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला असला तरी, १९९१ मध्ये ज्याप्रमाणे आर्थिक सुधारणा केल्यामुळे विकासाचा पाया रचला गेला. त्याचप्रमाणे गेल्या दीड वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करता येईल. आर्थिक सुधारणांमुळे या दशकात भारत ७ टक्क्यांपेक्षा जास्त दराने जीडीपीमध्ये वाढ दर्शवेल.

खाजगी गुंतवणुकीतून उत्पादनक्षमता वाढ त्यातून रोजगार निर्मिती तसेच वेतन वाढ होईल. पर्यायाने मागणीमध्ये वाढ होऊन लोकांची क्रयशक्ती वाढेल, असे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

आर्थिक विकासासाठी मुक्त व्यापाराला चालना आणि आणि मुक्त व्यापाराचे समर्थन या गोष्टी आपल्याला पाश्चिमात्यांनी शिकवलेल्या नसून त्या भारतीयांच्या जीवनशैलीचा गेली शतकानुशतके भाग आहेत. त्यामुळेच आपण आर्थिक सुधारणांच्या तत्त्वज्ञानामध्ये संपत्ती निर्माण करण्याकडे एक वरदान म्हणून पाहतो.

आर्थिक विकास होत असताना असमानतेकडे बोट दाखवणाऱ्या लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचे संकुचन झाल्याने श्रीमंतांपेक्षा मध्यमवर्गीय आणि गरिबांना जास्त त्रास झाला, हे समजून घेतले पाहिजे, असेही सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यम यांनी निदर्शनास आणून दिले की, जनधन आधार मोबाइलमुळे देशात कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली असून, मनरेगा हे रोजगाराचे वहन करणारे ठरले, असेही ते म्हणाले.

अर्थव्यवस्थेतील वाढीकडे पाहताना कोरोना संकटातील वर्षांचे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच अर्थव्यवस्थेच्या बळकटीमुळे देशातील कल्याणकारी कार्यक्रम अधिक क्षमतेने राबवणे शक्य होऊ शकेल, असेही सुब्रमण्यम यांनी नमूद केले.