डिजिटल होण्यास प्राधान्य मिळत असल्यानं आयटी व्यावसायिकांना येतायच 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:45 AM2021-07-15T11:45:48+5:302021-07-15T12:00:00+5:30

IT Sector : आयटी व्यावसायिकांकडून तब्बल ७० टक्क्यांपर्यंत वेतनवाढीची मागणी.

कोविड-१९ साथीमुळे देशातील कंपन्या डिजिटल होण्यास प्राधान्य देत असल्यामुळे आयटी व्यावसायिकांना अच्छे दिन आले असून, त्यांना एकाच वेळी अनेक कंपन्यांकडून प्रस्ताव येत आहेत.

या परिस्थितीचा फायदा घेऊन आयटी व्यावसायिक तब्बल ७० टक्क्यांपर्यंत वेतनवाढीची मागणी करीत आहेत.

टीमलीज, एबीसी कन्सल्टंट्स, क्यूज, टॅगड आणि रँडस्टँड यांसारख्या नोकर भरती संस्थांकडून यासंदर्भातील डेटा समोर आला आहे.

कोविड-१९ साथीच्या आधी नोकरी बदलताना आयटी व्यावसायिक १५ ते ३० टक्के वेतनवाढीची मागणी करीत असत. आता ते ५० ते ७० टक्के वेतनवाढ मागत आहेत.

नासकॉमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता गुप्ता यांनी सांगितले की, आयटी क्षेत्रात डिजिटल गुणवत्ता असलेले मनुष्यबळ प्राप्त करण्यासाठी सध्या जणू युद्धच सुरू आहे. साथीमुळे सर्वच कंपन्या व संस्थांना डिजिटल होण्याची घाई झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

सूत्रांनी सांगितले की, या परिस्थितीची कल्पना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला आधीच आली होती, असे दिसते. कारण कंपनीने एप्रिल-जून दरम्यान २०,४०९ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली.

कंपनीने एका तिमाहीत भरलेले हे सर्वाधिक मनुष्यबळ आहे.केपजेमिनी, गेनपॅक्ट आणि पब्लिसीज सेपियन्ट यांसारख्या काही कंपन्या येणाऱ्या काही महिन्यांत मनुष्यबळ वाढवीत आहेत.

कोविड-१९ साथीमुळे अनेक क्षेत्रातील कंपन्या आणि संस्था डिजिटल होण्यास प्राधान्य देत आहेत.

त्यामुळे आयटी कंपन्यांना सास (सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस), एडटेक, हेल्थटेक, गेमिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ऑटाेमेशन, डिजिटल ट्रान्सफाॅर्मेशन, ब्लॉकचेन आणि सायबर सेक्युरिटी आदी क्षेत्रातील अनुभवी आयटी व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात गरज लागत आहे.

अचानक मागणी वाढल्यामुळे आयटी व्यावसायिकांचा भाव वधारला आहे. त्याचा ते लाभही उठवीत आहेत.