ज्या वस्तूसाठी होता चीनवर 'निर्भर', त्याच्याच निर्मितीत भारत बनला 'आत्मनिर्भर', आता करणार निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:06 PM2020-06-29T20:06:12+5:302020-06-29T20:25:53+5:30

अगदी काही दिवसांपर्यंत भारत ज्या गोष्टींसाठी चीन किंवा इतर देशांवर अवलंबून होता त्यांचीच निर्मिती आता भारतात होऊ लागली आहे. त्यातही काही वस्तूंच्या निर्मितीत भारताने आता एवढी आघाडी घेतली आहे की, त्या वस्तूंची आता देशातून निर्यातही होणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र असे असले तरी कोरोनाचे हे संकट देशासाठी काही संधीही घेऊन आले आहे.

अगदी काही दिवसांपर्यंत भारत ज्या गोष्टींसाठी चीन किंवा इतर देशांवर अवलंबून होता त्यांचीच निर्मिती आता भारतात होऊ लागली आहे. त्यातही काही वस्तूंच्या निर्मितीत भारताने आता एवढी आघाडी घेतली आहे की, त्या वस्तूंची आता देशातून निर्यातही होणार आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारनेही परवानगी दिली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापूर्वी भारत हा पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजेच पीपीई किटसाठी इतर देशांवर अवलंबून होता. कारण क्लास-३ लेव्हलच्या पीपीई किट्स भारतात बनत नव्हत्या. मात्र आता भारताने पीपीई किटच्या निर्मितीत मोठी आघाडी घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारतच्या स्वप्नाला याच क्षेत्राने साकार केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशातील अनेक कंपन्यांनी पीपीई किट्सच्या निर्मितीला सुरुवात केली होती. गेल्या दोन महिन्यांत या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेत जागतिक स्तरावर दुसरे स्थान पटकावले आहे. आता भारत डब्ल्यूएचओने निर्धारित केलेल्या दर्जानुसार तयार केलेल्या पीपीई किट्सची निर्यात करणार आहे.

पीपीई किट्सच्या निर्मितीच्याबाबतीत उद्योग जगताने भारतीयांचा आत्मविश्वास वाढवला आहे. आतापर्यंत पीपीई किट्सच्या निर्यातीवर केंद्र सरकारने निर्बंध घातलेले होते. मात्र आता मोठ्या प्रमाणात होत असलेले उत्पादन विचारात घेऊन सरकारने दर महिन्याला पन्नास लाख पीपीई किट्सच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारतातून परदेशात पन्नास लाख पीपीई किट्सची निर्यात होणार आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत निर्यातीला प्रोत्साहन देताना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पन्नास लाख पीपीई किट्स निर्यात. करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०२० पूर्वी देशात स्टँडर्ड पीपीई किट्सची निर्मिती होत नव्हती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर सरकारने ५२ हजार पीपीई किट्स आयात केल्या होत्या. मात्र कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढल्याने या किट्स कमी पडल्या होत्या.

अमेरिका, चीन आणि युरोपियन देशात पीपीई किट्सची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. भारतसुद्धा या देशांमधूनच पीपीई किट्स आयात करत असे. मात्र आता भारतातही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पीपीई किट्सची निर्मिती होऊ लागली आहे उल्लेखनीय बाब म्हणजे या पीपीई किट्स आता निर्यात होणार आहेत.

भारतामध्ये सध्या डब्ल्यूएचओच्या निकषांनुसार १०६ निर्मिती कंपन्या पीपीई किट्सचे उत्पादन करत आहेत. या सर्वाची सुरुवात फेब्रुवारीनंतर झाली होती. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताला पीपीई किट्सच्या निर्यातीची जबाबदारी मार्च महिन्याच्या अखेरीस मिळाली होती.

देशातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट्सच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली होती. मात्र आता पीपीई किट्सच्या निर्यातीवरील ही बंदी. हटवण्यात आली आहे.