तरुणांनो, Google सीईओ सुंदर पिचाई यांचा 'हा' मंत्र तुमचं आयुष्यच बदलून टाकेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 10:26 AM2020-03-04T10:26:21+5:302020-03-04T11:03:48+5:30

गुगलशिवाय दररोज आपलं पानही हलत नाही, असं म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही. जगातल्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलचं नेतृत्त्व भारतात जन्मलेले सुंदर पिचाई करतात. शिक्षण, करिअर, त्यातली स्पर्धा, आयुष्यातली ध्येयं यावर पिचाईंनी केलेलं भाष्य तरुणांसाठी मार्गदर्शक आहे.

भारतात शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं जातं. पालक गांभीर्यानं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. शिक्षणाबद्दल सतत बोललं जातं. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे पुस्तकी ज्ञान मिळवण्यावर खूप भर दिला जातो. ठरवून दिलेल्या वाटांवरुन चालावं यासाठी विद्यार्थ्यांवर बरंच दडपणदेखील असतं.

मी शाळेत, कॉलेजमध्ये असताना खूप ऐकलं होतं. त्याला त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर खूप अवघड होईल, अशी वाक्य त्यावेळी वारंवार कानावर पडायची.

अमेरिकेत मात्र परिस्थिती वेगळी आहे. शेवटचं वर्ष पूर्ण होईपर्यंत अमेरिकेतले विद्यार्थी त्यांच्या करिअरची दिशा ठरवत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळतो. त्यांना नेमका कशात रस आहे, हे कळण्यासाठी त्यांना बराच कालावधी मिळतो. ज्याचा पुढे खूप उपयोग होतो.

आठवीत असल्यापासून अनेकजण आयआयटीची तयारी करतात. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं आणि आजही आहे.

कोणती गोष्ट करताना तुम्हाला आनंद मिळतो, कोणती गोष्ट करताना तुम्ही कंटाळा येत नाही, याचा शोध घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो.

मला कॉम्युटरशी संबंधित उत्पादनं तयार करण्यात रस होता. ती माझी आवड होती. ती आवड आजही कायम आहे. हे काम मी कायम एन्जॉय करतो.

चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यावर यश मिळतंच असं काही नाही. चांगल्या संस्थांना महत्त्व आहे. मात्र त्यामुळे यशाची खात्री देता येत नाही.

वेगळ्या गोष्टी करणं, वेगळ्या वाटा निवडणं, जोखीम पत्करणं, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही करत असलेल्या कामावर तुमचं प्रेम असणं सर्वाधिक महत्त्वाचं असतं.

तुमच्या मनाला कौल घ्या. तुमच्या मनाचं ऐका. त्यामुळे तुम्ही आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं कराल.

तुम्ही खूप कठीण गोष्टी करत असाल, तर ते चांगलंच आहे. कारण फार कोणी अवघड गोष्टी करायला जात नाही. त्यामुळे त्या मार्गात स्पर्धा फार कमी असते. यात तुम्ही अपयशी ठरलात, तरी त्यात तुम्हाला मिळणारा अनुभव फार मोलाचा असतो.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये कित्येक जण कंपन्या सुरू करतात. त्यातले बरेच स्टार्ट अप्स अपयशी ठरतात. मात्र नवं काही करताना आलेलं अपयशदेखील गौरवास्पद असतं. कारण इतर सर्व ठरलेल्या वाटांनी जात असताना तुम्ही एक वेगळी वाट निवडलेली असते.

तुमच्या आत घडणाऱ्या कधीही महत्त्वाच्या असतात. तुमच्या आसपास काय घडतंय हे फारसं महत्त्वाचं नसतं. ही गोष्टी कायम लक्षात ठेवा.

आयुष्यात कधी कधी अशा व्यक्तींसोबतही काम करायला हवं, ज्यांच्यासोबत तुम्हाला असुरक्षित वाटेल. काही मंडळी तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही स्वत:ची कामगिरी सुधारण्यावर भर देता. त्याउलट अतिशय सुरक्षित वातावरणात काम केल्यास तुमची प्रगती खुंटते. असुरक्षित वातावरणात शिकण्याची प्रक्रिया सुरू राहते.

तुम्ही एखाद्या कंपनीचं, टीमचं नेतृत्त्व करताना तुमच्या सहकाऱ्यांना एक उत्तम वातावरण उपलब्ध करुन देणं गरजेचं असतं. त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यावर विश्वास दाखवणं आवश्यक असतं.

तुम्ही एखाद्या टीमचं नेतृत्त्व करत असल्यास स्वत:च्या यशासाठी फारसे प्रयत्न करण्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या सहकाऱ्यांच्या यशासाठी प्रयत्न करा.