Budget 2022: केवळ उत्पादन, कृषीसारख्याच क्षेत्रांचा विचार करणं थांबवा; अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांचा अर्थमंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:36 AM2022-01-20T09:36:07+5:302022-01-20T09:49:02+5:30

Budget 2022 RBI Former Governor Raghuram Rajan : यावर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षांचं व्हिजन स्पष्ट झालं पाहिजे, राजन यांनी व्यक्त केलं मत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) १ फेब्रुवारी रोजी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर (Former RBI Governor) रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

भारतानं अर्थसंकल्पाची पारंपारिक प्रथा ताबडतोब सोडून द्यावी आणि केवळ उत्पादन किंवा कृषी यासारख्या क्षेत्रांचाच विचार करणे थांबवावं, असं ते म्हणाले.

"यावेळी भारताबाबत फारसं आशावादी किंवा निराशावादी असण्याची गरज नाही. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत ब्राईट स्पॉट आणि डार्क स्पॉटही आहेत," असं राजन यांनी ईटी नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

कोणत्याही अर्थसंकल्पासाठी बाजारपेठेसोबतच लोकांचा विश्वास कायम राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था रुळावर कशी येईल याची स्पष्ट ब्ल्यू प्रिंट असायला हवी. ब्लूप्रिंट विश्वासार्ह दिसली पाहिजे आणि त्यात अनावश्यक खर्चासाठी जागा असू नये असंही ते म्हणाले.

यावेळी मागणीचा सर्वाधिक विचार करण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्यांनी पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. देशात रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे. त्याच वेळी, देशांतर्गत स्टील, तांबे आणि सिमेंट इत्यादींना मागणी निर्माण करण्याची गरज आहे. मनरेगासारख्या (MGNREGA) योजनांसाठी निधी देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

सरकारनं टेलिमेडिसिन, टेलि-लॉईंग आणि एड्युटेक सारख्या नवीन क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या उद्योगांना निधीची गरज नाही, तर जागतिक मानकांच्या बरोबरीने डेटा संरक्षणासाठी अधिक चांगले नियम आवश्यक असल्याचं राजन यांनी नमूद केलं.

भारताने केवळ उत्पादन किंवा कृषी क्षेत्रांचा विचार करणं थांबवलं पाहिजे. त्याऐवजी, आपल्याला सर्व्हिसेसबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यंदाच्या अर्थसंकल्पात दूरदृष्टीची गरज आहे. यावेळी अर्थसंकल्पात दरवाढ किंवा कोणतीही सब्सिडी कमी करण्यावर चर्चा करावी, असं मला वाटत नाही. यामध्ये पुढील पाच वर्षांची दूरदृष्टी दिसावी असं वाटत असल्याचं राजन यांनी सांगितलं.

दरवर्षी यामध्ये थोडं अपडेट होऊ शकतं. परंतु ही दृष्टी कायमस्वरूपी असावी. नुकत्याच झालेल्या कृषी सुधारणांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी होत्या. पण मोदी सरकारला ते योग्य पद्धतीने हाताळता आले नाही, असंही ते म्हणाले.