IN PICS: आठवतात की विसरलात? कुठे गायब झालेत 90 च्या दशकातील बॉलिवूडचे हे लोकप्रिय स्टार्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 12:56 PM2020-07-17T12:56:31+5:302020-07-17T13:03:17+5:30

90च्या दशकात प्रकाशझोतात असलेले बॉलिवूडचे अनेक चेहरे आज अंधारात गुडूप झाले आहेत, आज कुठे आहेत हे कलाकार?

कृष्ण कुमार- बेवफा सनम या गाजलेल्या सिनेमाचा लीड अ‍ॅक्टर कृष्ण कुमार आठवतो? आजा मेरी जान, शबनम, पगला कहीं का अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आणि मग अचानक गायब झाला. आता तो काय करतो तर तो निर्माता बनलाय. 2005 पासून आजपर्यंत त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केलीय.

दीपक तिजोरी- आशिकी, सडक आणि खिलाडी अशा अनेक सुपरहिट चित्रपटात झळकलेला पण तरीही ‘फ्लॉप अ‍ॅक्टर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता दिपक तिजोरी सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. गेल्या काही वर्षांत तो इतका बदलला की, असे म्हटले जाते की,दिपक तिजोरीने स्वत:च कधीच सहाय्यक अभिनेत्याची भूमिका नाकारून मुख्य भूमिका मागितली नाही. सहाय्यक भूमिका नाकारण्याची हिंमत दाखवली असती तर दिपक तिजोरी आज इंडस्ट्रीचा मोठा हिरो असता.

विवेक मुशरान- विवेक मुशरानने सौदागर या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याचा निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाने तो एका रात्रीत स्टार झाला. पण एकवेळ अशीही आली की, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकेनासे झालेत. सौदागर सुपरहिट झाल्यानंतर विवेकने एका वर्षांत तीन-तीन चित्रपट केलेत. पण या चित्रपटांना सौदागर सारखे यश मिळू शकले नाही आणि विवेकचे स्टारडम धोक्यात आले आणि यानंतर अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला.

सुमीत सहगल - सुमीत आज कदाचितच लोकांच्या लक्षात असेल. संजय दत्त, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम करूनही त्याला फार ओळख मिळाली नाही.

अरविंद स्वामी- मणिरत्नम यांच्या अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारणारा अभिनेता अरविंद स्वामीने रोजा, बॉम्बे, मिनसारा असे अनेक सिनेमे केलेत. पण आज तो क्वचित कुठे दिसतो.

राहुल रॉय - राहुल रॉय हा काही वर्षांपूर्वी तरुणींच्या दिल की धडकन बनला होता. त्याला चांगलीच लोकप्रियता होती. नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्या काळात त्याची गणना केली जात असे. पण कालांतराने त्याची लोकप्रियता कमी होत गेली आणि लोकांना या अभिनेत्याचा विसर पडला.

अनु अग्रवाल - आशिकी या चित्रपटाची नायिका अनू अग्रवाल त्याकाळात प्रचंड प्रसिद्ध झाली होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून अनू मीडियापासून दूर आहेत. आशिकी या चित्रपटानंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. आपले करियर रुळावर आणण्याचा ती प्रयत्न करत असतानाच 1999 मध्ये तिच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि या अपघाताने तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले.

आयशा जुल्का - खिलाडी , जो जीता वही सिकंदर , बलमा , रंग आणि वक्त हमारा है' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्का आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. बॉलिवूडला अलविदा म्हणणारी आयशा जुल्का आज एक बिझनेस वूमन आहे.

रागेश्वरी - रागेश्वरी एक उत्कृष्ट अभिनेत्री होती, तितकीच एक उत्कृष्ट गायिकाही होती. तिचे अनेक अल्बम लोकप्रिय झाले होते. पण एक घटना अशी घडली की, रागेश्वरीच्या अख्खा आयुष्याला कलाटणी मिळाली. होय, सन 2000 मध्ये तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि रागेश्वरीचे अख्खे आयुष्य बदलले. शरीराचा डावा भाग पूर्णपणे लुळा पडला. तिला बोलताही येईना. अर्थात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द या जोरावर रागेश्वरी या आजारातून बरी झाली. सध्या ती लंडनमध्ये आपल्या पती व मुलीसोबत राहते.

नीलम कोठारी - अभिनेत्री नीलम कोठारीने अनेक वर्षांपूर्वी सिनेसृष्टीला रामराम ठोकला आणि हि-यांच्या बिझनेसमध्ये रमली. मुंबईत नीलमचे हि-यांच्या दागिन्यांचे मोठे दुकान आहे. 1984 मध्ये ‘जवानी’ या सिनेमाद्वारे नीलमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पुढे एकापेक्षा एक हिट चित्रपट आपल्या नावी केलेत. 2001 मध्ये प्रदर्शित ‘कसम’ या चित्रपटात नीलम शेवटची दिसली होती.

रंभा - रंभाने अतिशय कमी वयात अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. केवळ 15 वर्षांची असताना तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. . तिने आजवर 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर देखील ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत होती. पण लग्नानंतर तिने चित्रपटांत काम करणे कमी केले. ती टेलिव्हिजनवरील काही कार्यक्रमांमध्ये 2017 पर्यंत परीक्षकाची भूमिका बजावत होती. पण आता ती चित्रपटसृष्टीपासून दूर असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या कुटुंबियांसोबत घालवते.

Read in English