IN PICS : कधीकाळी लग्नात गाणारा दिलजीत दोसांज कसा बनला ‘किंग ऑफ पंजाबी फिल्म्स’?

By रूपाली मुधोळकर | Published: December 6, 2020 02:39 PM2020-12-06T14:39:54+5:302020-12-06T14:59:17+5:30

आज दिलजीत एक स्टार आहे. पण हे स्टारडम त्याला इतके सहजपणे मिळाले नाही. यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.

सध्या अभिनेता व गायक दिलजीत दोसांज जाम चर्चेत आहेत. शेतकरी आंदोलनावर कंगना राणौत बरळली आणि दिलजीतने तिला फैलावर घेतले. मग काय सोशल मीडियावर घमासान ट्वीटर वॉर सुरु झाले.ट्वीटरवर दिलजीत ट्रेंड होऊ लागला.

पाठोपाठ दिलजीतने दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या दिल्ली आंदोलनात सहभागी शेतक-यांच्या मदतीला धावून आला. या शेतक-यांना थंडीचे उबदार कपडे घेता यावेत म्हणून त्याने 1 कोटींची मदत जाहिर केली आणि तो ‘रिअल हिरो’ ठरला.

दिलजीत दोसांज पंजाबी म्युझिक व फिल्म इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. ‘किंग ऑफ पंजाबी फिल्म्स’ म्हणूनही त्याला ओळखले जाते.

दिलजीतने बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूड इंडस्ट्रीत गायक ते अभिनेता म्हणून तो लोकांच्या डोळ्यांत भरला.

आज दिलजीत एक स्टार आहे. पण हे स्टारडम त्याला इतके सहजपणे मिळाले नाही. यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.

गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलासाठी इंडस्ट्रीत ओळख निर्माण करणे सोपे नव्हते. दिलजीतचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैशाअभावी दिलजीतला दहावीनंतर शिक्षण पूर्ण करता आले नाही.

दिलजीत पंजाबच्या जालंधर जिल्ह्याच्या दोसांज गावाचा राहणारा आहे. त्याचे खरे नाव दलजीत सिंह आहे. यानंतर त्याने ते बदलून दिलजीत दोसांज ठेवले.

दिलजीतला लहानपणापासून गाण्याची आवड होती. गुरूद्वारात तो गुरबानी किर्तन करायचा. हा गुरबानी किर्तन करणारा मुलगा एकदिवस स्टार बनेल, असा विचारही कोणी केला नव्हता.

सुरुवातीच्या काळात दिलजीतने स्टेज शो केलेत, लग्नात गायला. आज हाच दिलजीत करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.

2004 मध्ये पंजाबी इंडस्ट्रीत त्याला पहिला ब्रेक मिळाला. इश्क दा उडा अडा हा त्याचा पहिला अल्बम आला आणि यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

‘द लायन ऑफ पंजाब’ या सिनेमातून त्याची अभिनयाची कारकिर्द सुरु झाली. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्या दुस-या सिनेमाचे शूटींगही सुरु झाले. मात्र पहिला सिनेमा आपटला. दिलजीत काहीचा निराश झाला. आता अभिनय कधीच करायचा नाही, असे त्याने ठरवले. पण दुसरा सिनेमा हिट झाला आणि दिलजीतचा अभिनय प्रवास सुरु राहिला.