आत्मविश्वास कमवायचा आहे? फक्त 'या' तीन गोष्टी करा! - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 08:00 AM2021-04-01T08:00:00+5:302021-04-01T08:00:02+5:30

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तीच व्यक्ती यशस्वी होते, जिच्याकडे आत्मविश्वास असता़े हा आत्मविश्वास मिळवायचा कसा? तो विकत मिळत नाही, कमवावा लागतो. त्याचे तीन सोपे मार्ग सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते गौर गोपालदास प्रभू!

प्रत्येक जण आपली क्षमता ओळखून असतो. परंतु, काही जण स्वत:ला अकारण कमकुवत समजण्याची चूक करतात. या जगात कमकुवत कोणीही नसते. देवाने प्रत्येकाला एक वेगळेपण घेऊन पाठवले आहे. ज्याला आपण बलस्थान म्हणतो. ते वेगळेपण कोणते, याचा शोध घ्या आणि त्यावर लक्ष केन्द्रित करा. काय येत नाही, याचा विचार करण्यात काय येत आहे यावर काम केले तर आत्मविश्वास नक्की वाढेल. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. दुसऱ्यांशी तुलना करण्यात वेळ न दवडता स्वत:ला घडवण्यात वेळ खर्च करा.

रामायणात समुद्र लांघून जाण्याचा प्रसंग सर्वांना माहित आहे. समुद्र पार कसा करता येणार, या विचाराने सगळी वानरसेना हतबल होऊन बसली होती. त्यात हनुमान देखील होते. तेव्हा जांबुवंतांनी हनुमंताला त्याच्या शक्तीचा परिचय करून दिला आणि त्याच्या क्षमतेची ओळख करून दिली. असे जांबुवंत आपल्याही सभोवती असतात, जे आपल्या क्षमतेवर विश्वास दाखवतात. त्यांच्या सतत संपर्कात राहा. जेव्हा सगळे जग तुम्हाला जमणार नाही असे म्हणेल, तेव्हा असे जांबुवंत तुमच्यातील हनुमान शक्तीचा परिचय करून देतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

शिकवणी लावून आत्मविश्वासाचे धडे मिळत नाहीत. माणूस चुकत, पडत, शिकत, ठेचकाळत पुढे जातो. या अनुभवातूनच आत्मविश्वास दुणावतो. जोवर तुम्ही प्रयत्नच करणार नाही, तोवर तुम्हाला स्वत:ला आजमावून पाहताच येणार नाही. यासाठी मनाची पूर्ण तयारी करा. परिस्थितीचा सर्वांगीण विचार करा. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झोकून द्या. हरलात तर अनुभव मिळेल, जिंकलात तर आत्मविश्वास मिळेल! पराभवाने खचून जाऊ नका. छोटीशी मुंगी या बलाढ्य जगात तग धरून जगू शकते, स्वत:चा दाणा पाणी मिळवू शकते, तर धडधाकट माणूस का नाही? ही सकारात्मक विचारसरणी तुम्हाला आत्मविश्वास देत राहील.